स्वराज्यस्थापना

सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व उदयास आले. त्यांनी येथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म शके १५५१, फाल्गुन वदय तृतीयेस म्हणजेच १९ फेब्रुवारी, १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी केलेल्या स्वराज्यस्थापनेची माहिती आपण या पाठात करून घेणार आहोत.

शहाजीराजे

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी • निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत विजापूरच्या शहाजीराजे आदिलशाहाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये, ही शहाजीराजांची भावना होती.

म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही बाचवण्याचा प्रयत्न केला; परंतु मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही. इ.स. १६३६ मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली.निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार झाले. शहाजीराजांकडील भीमा व नीरा या नद्यांमधील पुणे सुपे, इंदापूर व चाकण हे परगणे हा त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूख आदिलशाहाने त्यांच्याकडेच ठेवला. आदिलशाहाकडून त्यांना कर्नाटकात बंगळूरू व त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला.

शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते. तसेच, तलवार, पट्टा आणि भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत असत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा मोठा दरारा होता.

शिवराय आणि जिजाबाई बंगळूरू येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनण्यासाठी योग्य असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे, ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना स्वराज्य संकल्पक म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू व कर्तबगार सहकाऱ्यांनिशी बंगळूरूहून पुण्याला पाठवले.

वीरमाता जिजाबाई

जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील मातब्बर सरदार लखुजीराजे जाधव यांच्या कन्या होत. त्यांना लहानपणीच विविध विदयांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे, म्हणून त्या त्यांना प्रोत्साहन देऊन साहाय्य करत असत.

त्या कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्यस्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठीनिवाडे देण्याचे कामहीत्या करत असत. त्या शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, वाक्चातुर्य, सत्यप्रियता, दक्षता, धैर्य, निर्भयता, स्व

शिवरायांचे सहकारी

राज्यस्वप्न इत्यादींचे विजयाकांक्षा, शस्त्र प्रयोग, संस्कार केले.

शिवाजी महाराजांनी स्वराज्यस्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याच्या पुणे जिल्ह्याचा पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी स्वराज्यस्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली.

स्वराज्यस्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी व सहकारी मिळाले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुद्गल, नन्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला तानाजी मालुसरेकान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे ही त्यांतील काही नावे होत. या सहकाऱ्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्याच्या स्थापनेचे कार्य हाती घेतले.

राजमुद्रा

स्वराज्यस्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. या राजमुद्रेवर पुढील संस्कृत ओळी कोरलेल्या आहेत.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ।।

शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।

अर्थ

“शहाजीचा पुत्र शिवाजी याची (शुक्ल पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा (प्रजेच्या) कल्याणासाठी अधिराज्य गाजवते (शोभून दिसते). “

मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टींनी महत्त्वाचा आहे. महाराजांनी या बचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारत जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधीलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे.

स्वराज्यस्थापनेच्या हालचाली

शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अमलात नव्हते, तर ते आदिलशाहीच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येत असे. ज्याचे किल्ले त्याचे राज्य’ अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते.

त्यांनी तोरणा, मुरूंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव ‘राजगड’ ठेवले. राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे व सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्यस्थापनेसाठी आवश्यक होते.

जावळीचा ताबा

सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार होता. स्वराज्यस्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला. तेव्हा इ.स. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले.

शिवाजी महाराजांनी यानंतर कल्याण व भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्दी, पोर्तुगीज व इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल, तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आरमार उभारणीकडे लक्ष दिले.

अफजलखानाचे पारिपत्य

शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील व आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोऱ्यांचा विरोध मोडून काढलेला होता. कोकण किनारपट्टीवर स्वराज्यस्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी हे आदिलशाहीस आव्हान होते. या वेळी आदिलशाहीचा कारभार बड़ी साहेबीण पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे, असे तिला वाटत होते. म्हणून तिने आदिलशाहीतील अफजलखान या बलाढ्य व अनुभवी सरदारास शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.अफजलखान विजापूरहून वाई येथे आला. त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती.

वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची १० नोव्हेंबर १६५९ रोजी भेट झाली. या भेटीत अफजलखानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले.

अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली, त्यांना बक्षिसे दिली. अफजलखानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले, त्यांना त्यांनी चांगली वागणूक दिली.

सिद्दी जौहरची स्वारी

अफजलखानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी ‘विशाळगड’ असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाहाने इ.स. १६६० मध्ये सिद्दी जौहर या कर्नुल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले.

त्याला ‘सलाबतखान’ असा किताब दिला. सिद्दी जौहरच्या मदतीस रुस्तुम-इ-जमान, बाजी घोरपडे आणि अफजलखानाचा मुलगा फाजलखान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे पाच महिने सिद्दीच्या सैनिकांचा पन्हाळ्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पालकरने बाहेरून सिद्दीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्दी वेढा उठवेल, अशी चिन्हे दिसत नव्हती. म्हणून महाराजांनी सिद्दीशी बोलणी सुरू केली.

त्यामुळे सिद्दीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा महाराजांना झाला.या प्रसंगी गडावरील शिवा काशिद या बहादूर तरुणाने पुढाकार घेतला. तो दिसायला शिवरायांसारखाच होता. त्याने शिवाजी महाराजांची वेषभूषा करून तो पालखीत बसला. पालखी राजदिंडी दरवाज्यातून बाहेर पडली. सिद्दीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशिदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्या सोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते.

शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्दीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्दीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याजवळ थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे याच्याकडे सोपवली. • बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत त्या सैन्यास अडवले.

बाजीप्रभूने पराक्रमाची शर्थ केली, परंतु या संघर्षात त्याला वीरमरण आले. त्याच्या सैन्याने सिद्दीच्या सैन्याला थोपवून विशाळगडाकडे कूच धरल्यामुळे महाराजांना करणे शक्य झाले. विशाळगडाकडे जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोधही मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले.

महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते, त्याच वेळी दिल्लीच्या तख्तावर आलेल्या औरंगजेब बादशाहाने मुघल सरदार शायिस्ताखान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केलेली होती. त्या वेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशीही संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे, ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहाबरोबर तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला. येथे शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा एक टप्पा पूर्ण झाला.

Leave a Comment