चित्रातून आपण घरांचे विविध प्रकार पाहिले. घरांचा उपयोग प्रामुख्याने खालील बाबींसाठी होतो.
* निवान्यासाठी.
* विश्रांतीसाठी.
* थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी.
* जंगली श्वापदांपासून संरक्षण होण्यासाठी
* समाजकंटकांपासून सुरक्षित राहण्यासाठी.
वरील आकृतीत भारताचा नकाशा व त्या त्या भागात पूर्वीपासून वापरात असलेले घरांचे प्रकार दाखवले आहेत. घरांच्या रचनेमध्ये प्रदेशांनुसार होणारे बदल समजून घ्या.
(१) जास्त पावसाचे प्रदेश
(२) मध्यम पावसाचे प्रदेश
(३) कमी पावसाचे प्रदेश
(४) वाळवंटी प्रदेश
(५) दलदलयुक्त प्रदेश
( ६ ) पर्वतीय प्रदेश
(७) मैदानी प्रदेश.
त्या त्या प्रदेशांत असलेल्या हवामानानुसार व उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून माणसाने घरे बांधलेली आढळतात. घरांच्या प्रकारात, त्यांच्या रचनेत, ती बांधण्यासाठी वापरलेल्या साहित्यात विविधता आढळते. यामुळे आपल्याला घरांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. प्रत्येकाला हवा, अन्न, पाणी, वस्त्र व निवाऱ्याची गरज असते; परंतु या गरजांची पूर्तता सर्वांच्या बाबतीत होतेच असे नाही. त्यामुळे खालील बाबी घडतात.
निवारा नसलेले अनेक लोक आपल्या अवतीभवती दिसतात. असे लोक रस्त्याच्या बाजूच्या माळरानावर, पदपथांवर, पुलाखाली पडक्या इमारतींमध्ये, रेल्वे स्टेशन किंवा बसस्थानके अशा अनेक ठिकाणी निवारा करून राहतात. उपजीविकेचे साधन मिळत नसल्यामुळे किंवा ते पुरेसे नसल्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागते.
बेघर असणे ही एक सामाजिक समस्या आहे. शासन अशा व्यक्तींना घरे बांधून देण्यासाठी अनेक योजना राबवते. काही शहरांमध्ये शासनामार्फत बेघरांसाठी रात्रनिवारेसुद्धा उपलब्ध केले जातात.
जगाची लोकसंख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने घरे बांधली जात आहेत. घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक साधने वापरली जातात. ही साधने मिळवण्यासाठी खालील बाबी केल्या जातात. त्यामुळे जल, वायू, ध्वनी व मृदेचे प्रदूषण होते, तसेच पर्यावरणाची हानी होते.
• डोंगर पोखरणे.
• समुद्रकिनारा तसेच नदीपात्रातून वाळू उपसा करणे.
• जमिनीतून दगडमाती काढणे.
• जमिनीतील पाण्याचा अतिरेकी उपसा करणे.
• जमीन मोकळी करण्यासाठी झाडे तोडणे.
• तळी, ओढे, नद्या, खाड्या व सखल भागात भर घालून जमीन तयार करणे.
शेती व इतर उपयोगांसाठी असलेली जमीन वाढत्या शहरीकरणामुळे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी वापरली जाते. शेतीसाठी जमीन कमी पडू लागल्याने वनांसाठी राखलेली जमीनही शेतीसाठी वापरतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेश कमी होतो. घरांसाठी लागणारे साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो.
मातीपासून विटा, चुनखडीपासून सिमेंट, वाळूपासून काच बनवणे इत्यादींसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, नैसर्गिक वायू व खनिज तेल यांसारखी नैसर्गिक इंधने वापरतो. ही इंधने एकदा वापरली की संपतात. या ऊर्जास्रोतांच्या ज्वलनातून वायू प्रदूषणही होते.
हे ऊर्जास्रोत निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्षे लागतात. त्यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या व प्रदूषण न करणाऱ्या सौरऊर्जा, पवनऊर्जा यांसारख्या ऊर्जास्रोतांचा वापर वाढवायला हवा. हे संपुष्टात न येणारे ऊर्जास्रोत आहेत. सर्व सजीवांना निवाऱ्याची आवश्यकता असते.
माणसाप्रमाणेच इतर काही सजीवही पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार करतात. त्यांचे निवारे पर्यावरणपूरक व तात्पुरते असतात. हे आपण मागील इयत्तेत पाहिले आहे. अशी पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी घरे आपल्यालासुद्धा बनवता आली पाहिजेत.
पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये
• नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर.
• बायोगॅस, पवनऊर्जा व सौरऊर्जा यांसारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर.
• पाण्याचा पुनर्वापर
• टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर. कृत्रिम साहित्य व कृत्रिम रंगांचा अभाव.
• घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची सोय.
जलपर्यटन हा एक महत्त्वाचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पर्यटकांचे निवारे समुद्राखाली तयार केले आहेत. या निवाऱ्यातून समुद्राच्या तळाचे तसेच तेथील मनोहारी सागरी जीवनाचे दृश्य प्रत्यक्ष अनुभवता येते. असे निवारे युरोप, उत्तर अमेरिका येथील किनारी भागांत पाहायला मिळतात.
मुंबई शहर हे सात बेटांवर वसलेले आहे. या बेटांच्या दरम्यान असलेल्या जलभागांवर दगड व मातीचे भराव घालून जमीन तयार केली गेली. नंतर त्यावर बस्ती, रस्ते व उद्योग विकसित झाले. जलभाग बुजवून तयार केलेला हा प्रदेश सखल भागात असल्याने आजही अतिवृष्टीमुळे या भागात पाणी साचते.