या पाठात आपण भाषा, क्रीडा, नाटक आणि चित्रपट, वृत्तपत्रे आणि दूरदर्शन या क्षेत्रांत झालेल्या बदलांविषयी माहिती घेणार आहोत.
भाषा : भारतात हिंदी, आसामी, बंगाली, गुजराथी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगु, उर्दू, कोंकणी, मणिपुरी, नेपाळी आणि सिंधी या भाषा महत्त्वाच्या आहेत. त्या भारतीय भाषांच्या बोलीभाषा सुदधा आहेत. त्यांची संख्या आता कमी होत आहे. त्या वेळीच जपायला हव्यात. अन्यथा एक चांगला ठेवा नष्ट होईल. असे असले तरी हिंदी चित्रपटांमधून सर्वत्र पोहचलेल्या हिंदी भाषेने भाषिकदृष्ट्या देश जोडण्याचे काम केले आहे.
१९९० नंतर सुरू झालेल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे भारतात इंग्रजी भाषेचे प्राबल्य वाढत चालले आहे. इंग्रजी ही भाकरीची भाषा होऊ लागली आहे. नोकरीच्या अनेक संधी इंग्रजी भाषेमुळे उपलब्ध होऊ लागल्या आहेत. इंग्रजी शिकण्यात भारतीय लोक आघाडीवर आहेत. तथापि या प्रक्रियेने प्रादेशिक भाषांचे अस्तित्त्व धोक्यात येऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
क्रीडा : स्वातंत्र्यपूर्वकाळात क्रीडा क्षेत्रात मोजक्या खेळांची नावे घेतली जायची. यात बदल करण्याचे काम काही खेळाडूंनी केले. त्यामुळे खेळ आणि खेळाडू दोघेही मोठे झाले. यांतील एक उदाहरण म्हणजे गीत सेठी होय. बिलियईस या खेळाच्या स्नूकर या प्रकारात सेठी यांनी जागतिक प्रावीण्य मिळवले. वयाच्या १५व्या वर्षी बिलियर्ड्सची कुमार राष्ट्रीय स्पर्धा त्यांनी जिंकली.
पुढे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी अजिंक्यपदे मिळवली. जागतिक व्यावसायिक स्पर्धेत पाच वेळा, जागतिक हौशी बिलियर्ड्स स्पर्धेत तीन वेळा त्यांनी विजेतेपद मिळवले. या खेळाला त्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. वृत्तपत्रांमध्ये या खेळाच्या बातम्या छापून येण्यास सेठी यांचे कर्तृत्व कारणीभूत आहे. भारतातील उदयोन्मुख खेळाडूंस त्यांनी नवे क्षेत्र उपलब्ध करून दिले.
१९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आणि या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली. याच वर्षी सुनील गावसकर यांनी कसोटींमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. १९८५ मध्ये भारताने ‘बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले.
याचा परिणाम भारतातल्या सर्वच राज्यांमध्ये कमी अधिक क्रिकेट प्रमाणात खेळ हा खेळला जाऊ लागला. देशी खेळ मागे पडून क्रिकेटचा खेळ आघाडीवर आला. क्रिकेट या खेळाला केंद्रस्थानी ठेवून काही चित्रपटांची निर्मिती करण्यात आली. दूरदर्शनवर पूर्ण पाच दिवस एक दिवस असे खेळाचे प्रसारण सुरू झाले. याचा एशियाड आणि ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारत सहभागी होता.
इ.स. २००० च्या ऑलिंपिकमध्ये करनाम मल्लेश्वरी हिने भारत्तोलन (वेटलिफ्टिंग) पदक मिळवले. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला होय. हॉकी, तिरंदाजी, पोहणे, वजन उचलणे, टेनिस, बॅडमिंटन या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व वाढू लागले.
नाटक आणि चित्रपट : नाटक आणि चित्रपट हा भारतीयांच्या जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. पूर्वी नाटके खूप वेळ कधी-कधी रात्रभर चालायची. आताच्या काळात नाटकांचे स्वरूप, तंत्र, वेळ बदलून गेले. वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोक नाटकांमध्ये सामील होऊ लागले. संगीत रंगभूमीचे महत्त्व पूर्वीपेक्षा कमी होऊ लागले. पौराणिक व ऐतिहासिक विषयांऐवजी राजकारण, समाजकारण या विषयांना प्राधान्य मिळू लागले.
चित्रपटाच्या क्षेत्रात कृष्णधवल चित्रपटांच्या नंतर रंगीत चित्रपटांचे युग आले. मनोरंजन क्षेत्रातील हिंदी चित्रपटांचे स्थान अतुलनीय आहे. समकालीन परिस्थितीचे चित्रण चित्रपटांमध्ये उमटू लागले. चित्रिकरणाची स्थळे देशाबाहेर जाऊ लागली. देश परदेशांतील वैविध्यपूर्ण जागा लोकांना दिसू लागल्या. परकीय भाषांमधील चित्रपट अनुवादित होऊ लागले. इंग्रजी चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी हिंदी अनुवाद पडद्यावर दिसू लागले.
हिंदी चित्रपट जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करू लागले. हिंदी चित्रपट जगभर पोहचले. राजकारण, समाजकारण, उद्योग, तंत्रज्ञान यांचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागले. पूर्वी ३-४ तास चालणारा सिनेमा दीड तासांवर येऊ लागला. एकच पडदा आणि एकच चित्रपटगृह ही संकल्पना बदलली.
यामुळे एकच सिनेमा १०० आठवडे चालण्याचे प्रमाण संपून एक चित्रपट एकाच वेळी देशा-परदेशांत हजारो चित्रपटगृहांमध्ये दिसू लागला. यामुळे चित्रपटांचे अर्थकारण बदलून गेले. चित्रपट निर्मितीस उद्योगाचा दर्जा प्राप्त झाला. हा उद्योग कोट्यवधी लोकांना सामावून घेऊ लागला. प्रादेशिक भाषांमधील चित्रपट उद्योग बहरून आला.
वृत्तपत्रे : बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव वृत्तपत्रांवर आणि प्रसारमाध्यमांवर पडला. या माध्यमांचा प्रभाव व्यक्तिगत आणि सामूहिक जीवनावर सुद्धा पडला. स्वातंत्र्योत्तर कालखंडात दैनंदिन घडामोडींच्या ताज्या बातम्या देणे, जाहिराती छापून उद्योग-व्यवसायाला चालना देणे, लोकमत घडवणे, लोकमत विधायक कामासाठी प्रभावित करून प्रसंगी नेतृत्व करणे, प्रबोधन करणे, शासन व्यवस्थेवर अंकुश ठेवणे अशा विविध उद्दिष्टांनी वृत्तपत्रे कार्यरत होती.
या काळात वृत्तपत्रे कृष्णधवल रंगांत छापली जात होती. पुढे काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली. पूर्वी तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना खूप मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. वृत्तपत्रे आता अधिकच सक्रीय होऊ लागली आहेत.
दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे, हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे वा पुरस्कृत करणे अशा विविध मार्गांनी वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत.
दूरदर्शन : भारतात स्वातंत्र्योत्तर कालखंडात दूरदर्शनचे आगमन झाले. सुरुवातीला कृष्णधवल असणारे दूरदर्शन पुढे रंगीत झाले. सुरुवातीला मोजकेच कार्यक्रम आणि ठरावीक वेळ मनोरंजन असे दूरदर्शनचे स्वरूप होते. पुढे शैक्षणिक उपक्रम, वार्तापत्रे, राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यांचे सविस्तर वार्तांकन, बातम्या असे एक-एक उपक्रम वाढत गेले.
रामायण आणि महाभारत या मालिकांच्या काळात बहुसंख्य लोक दूरदर्शनसमोर बसून असायचे. या माध्यमाच्या लोकप्रियतेची चुणूक या मालिकांनी दाखवून दिली. १९९१ च्या इराक युद्धाचे जिवंत दृश्य वार्तांकन सीएनएन वाहिनीने जगभर दाखवले. या टप्प्यावर भारतातील वृत्तवाहिन्यांचे विश्वच बदलून गेले. १९९८ मध्ये स्टार (सॅटेलाइट टेलिव्हिजन एशिया रिजन) हा खासगी उद्योगसमूह भारतात आला.
यामुळे भारतातील सुरुवातीच्या काळातील नीरस, एकसुरी, प्रचारकी स्वरूपाच्या बातम्यांचे विश्वच बदलून गेले. भाषा, सादरीकरणाचे तंत्र, तंत्रसज्ज स्टुडिओ आणि ओबी (आउटडोअर ब्रॉडकास्टिंग) व्हॅन्सचा वापर यांमुळे या वाहिन्यांनी विस्तार घडवून आणला. यामुळे वार्तांकनात खुलेपणा, बहुविधता आली. देशाचा कानाकोपरा जोडला गेला.
याचा परिणाम राजकारणावर सुद्धा झाला. सारा देश बदलू लागला. आतापर्यंत आपण आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला. पुढील वर्षी ‘इतिहास’ या विषयाचे व्यवहारिक जगतात उपयोजन कसे करायचे हे आपण शिकणार आहोत. इतिहास हा दैनंदिन जगण्याचा भाग कसा होऊ शकतो हे आपण बघणार आहोत.