आपला देश विविध नदया, पर्वत, पठारे, मैदाने, बेटे इत्यादींनी नटलेला आहे. भारतीय भूखंडाच्या तीन दिशांना पाण्याने व्यापलेल्या व दक्षिणेकडे निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘भारतीय द्वीपकल्प’ म्हणतात. आपली उत्तरेकडील सीमा हिमालयासारख्या अतिउंच पर्वतरांगांनी तयार झाली आहे. आपल्या देशात बने, मैदाने, वाळवंटे इत्यादी आहेत.
आपल्या देशाचा विस्तार मोठा आहे. शिवाय समुद्रसपाटीपासून उंचीतील फरक ८००० मीटरपेक्षा जास्त आहे. त्यामुळे प्रदेशांनुसार भारताच्या हवामानात विविधता आढळते. हवामानातील या विविधतेमुळे वनस्पती, प्राणी व पक्ष्यांमधील विविधतासुद्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. तसेच पीकपाण्यातही विविधता आढळून येते.
जसे, उत्तर भारतात गहू हे प्रमुख पीक आहे, तर किनारपट्टीचा प्रदेश व दक्षिण भारतात भात हे प्रमुख पीक आहे. मध्यभारतात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. सर्व विविधतेचा सर्वांगीण परिणाम आपले जीवनमान, चालीरीती, परंपरा, लोकजीवन व संस्कृतीवर झालेला आढळतो. आपल्या देशात विविध जाती, जमाती व धर्मांचे लोक राहतात.
विविध भाषा बोलल्या जातात. प्रदेशानुसार आहारात पेहरावात, सण-उत्सव, इत्यादींमध्ये आपण ही विविधता सहज पाहू शकतो.
भारत हे लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र आहे. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील सर्वांत मोठे राज्य आहे. त्यानंतर मध्यप्रदेश व तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र राज्य आहे. गोवा हे भारतातील सर्वांत कमी क्षेत्रफळ असलेले राज्य आहे.
भारतातील विविध प्रदेशांनुसार पिकांच्या उत्पादनातही आपल्याला फरक आढळतो. बाजारात किंवा दुकानात आपल्याला मिळणाऱ्या चहा, कॉफी, संत्री, आंबे इत्यादी वस्तू नेमक्या कोठे उत्पादित होतात.
भारतीय क्षेत्रात भारताच्या मुख्यः भूमी शिवाय अनेक बेटांचा समावेश होतो.
१. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे.
२. बंगालच्या उपसागरातील अंदमान आणि निकोबार बेटे.
३. भारताच्या मुख्य भूमीजवळील समुद्रातील बेटे.
या सर्व बेटांची स्थाने देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. महाराष्ट्राच्या किनाऱ्याच्या रक्षणासाठी यातील काही बेटांवर किल्ले बांधले गेले. हे ऐतिहासिक किल्ले जलदुर्ग म्हणून ओळखले जातात. कोकण किनारपट्टीवर असे किल्ले अनेक ठिकाणी पहायला मिळतात. हर्ष व तनिष्का मुंबईला राहतात. त्यांना अंदमान आणि निकोबार बेटे पाहायची आहेत. प्रथम ते चेन्नई येथे मामाकडे जाणार आहेत. त्यानंतर या बेटांना भेट देणार आहेत.