Paryavarnache Santulan – पर्यावरणाचे संतुलन

एखादया क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात, त्यांची संख्या खूप मोठी असते. दिन-रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंदी घेतात. खूप उंचावरच्या भागात व खोल पाण्यात राहणान्या सजीवांचे, तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात.

सजीवांचे-निरीक्षण

अनेक वैज्ञानिकांनी केलेली निरीक्षणे जमा केली जातात. त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. असे सर्व प्रयत्न दीर्घकाळपर्यंत केले जातात, तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री वाटते.

पर्यावरण

परिसर’ हा शब्द तुम्हांला माहीत आहे. ‘शाळेचा परिसर सुंदर आहे’, ‘बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे’, अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. परिसर म्हणजे आसपासची जागा. घराच्या शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर अधिक मोठा असतो. सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती, वनस्पती व प्राणी अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो.

जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते. सजीव आणि निर्जिव एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाण घेवाण म्हणजेच आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियांचा अभ्यास पर्यावरणशास्त्रात केला जातो.

 

अन्नसाखळी

खालील चित्र पहा.

अन्नसाखळी

साखळीत अनेक कड्या आहेत. यांतील कड्या सुट्या झाल्या, तर त्यांना साखळी म्हणता येईल का? साखळीतील प्रत्येक कड़ी एक संपूर्ण वस्तू असली, तरी ती मागे व पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली आहे. एखादी कडी निसटली, तर साखळी खंडित होते.

सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती, नाकतोडा, पक्षी असे वेगवेगळे घटक एका ठरावीक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. ते अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत, म्हणून ते एका साखळीचे घटक आहेत असे आपण म्हणतो. अशा साखळीला अन्नसाखळी म्हणतात. त्यातील प्रत्येक घटक एका अन्नसाखळीची एक कडी आहे.

अन्नजाळे

अन्नसाखळी

एकच सजीव वेगवेगळ्या अन्नसाखळ्यांचा घटक असू शकतो. त्यामुळे निसर्गात अन्नजाळे दिसते.

विविध-अन्नसाखळ्या-मिळून-तयार-झालेले-अन्नजाळे

अन्नसाखळीतील मुख्य अन्न वनस्पती

प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळते. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बनडायऑक्साइड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात, म्हणजेच प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच असतात.

 

वनस्पती
पर्यावरणाचे संतुलन

आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. पर्यावरणातील अन्नसाखळ्यांमुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. पालापाचोळा, प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजवण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करत असतात. यामुळे मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात.

त्यांचा वापर करून वनस्पती वाढतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतींची वाढ होणे आणि प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून हे पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे, है पर्यावरणातील महत्त्वाचे चक्र आहे. याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळत राहते.

पर्यावरणाचे-संतुलन

सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साइड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. या क्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हेही एक नैसर्गिक चक्र आहे. पर्यावरणात अशी इतरही अनेक चक्रे असतात.

सजीव सजीव व सजीव-निर्जीव यांमध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. यामुळेच पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिली, की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते.

Leave a Comment