प्रतापगडावरील पराक्रम

Pratapgad-Killa

आदिलशाही हादरली

विजापूरच्या दरबारातील गोष्ट. शिवरायांच्या वाढत्या हालचाली ऐकून आदिलशाही दरबार काळजीत पडला. दरबारात झाडून सारे सरदार गोळा झाले. एकेक गाजलेले समशेरबहाद्दर दरबारात हजर होते. आदिलशाही कारभार बघणारी बडी साहेबीण जातीने दरबारात हजर होती.

दरबारापुढे महत्त्वाचा प्रश्न होता- ‘शिवाजीचा बीमोड कसा करायचा ?” बडी साहेबीण हिने दरबारातील सरदारांना खडा सवाल केला, “सांगा, कोण तयार आहे शिवाजीचा बंदोबस्त करायला ?” दरबारात शांतता पसरली.

जो तो आपल्या जागी चूप! शिवरायांशी मुकाबला करण्याचे धाडस कोण दाखवणार? जो तो एकमेकांकडे बघू लागला. एवढ्यात धिप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. त्याचे नाव होते अफजलखान.

खानाने विडा उचलला 

तबकातील विडा उचलत अफजलखान म्हणाला, “शिवाजी ? कुठला शिवाजी ? त्याला मी जिवंत कैद करून येथे घेऊन येतो आणि तसा न सापडला पकडून तर त्याला ठार मारून विजापुरी आणतोच आणतो.” “

अफजलखान म्हणजे विजापूर दरबारचा भारी सरदार. तुफान ताकदीचा ! पोलादी पहार हातांनी वाकवणारा. भल्याबुऱ्या कोणत्याही मार्गाने आपले काम करण्यात त्याचा हातखंडा ! अशा अफजलखानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात उचलला.

सारा दरबार खूश झाला. दरबारात हजर असलेल्या प्रत्येकाला वाटले, ‘आता शिवाजी भोसला कसला जिवंत राहतो ! थोड्याच दिवसांत विजापूर दरबारात साखळदंडात बांधलेल्या अवस्थेत शिवाजी हजर होणार, नाहीतर त्याचे मुंडके तरी दरबारात सादर होणार.’

अफजलखान मोठ्या ऐटीने, थाटामाटाने विजापुरातून बाहेर पडला. त्याने आपल्याबरोबर प्रचंड फौज व लढाईचे सामान घेतले. यापूर्वी अफजलखान बारा वर्षे वाईचा सुभेदार होता. त्यामुळे त्याला त्या मुलखाची चांगली माहिती होती. मोठ्या घमेंडीने तो महाराष्ट्राची वाट चालू लागला.

स्वराज्यावरील संकट

शिवराय त्या वेळी राजगडावर होते. त्यांना अफजलखान चालून येत आहे ही बातमी कळली. स्वराज्यावर मोठे संकट आले, हे त्यांनी ओळखले, पण ते डगमगले नाहीत. त्यांनी विचार केला – खान कपटी, त्याची फौज मोठी. आपले राज्य लहान, आपले सैन्य लहान.

उघड्या मैदानावर काही खानापुढे आपला निभाव लागणार नाही ! त्याच्याशी युक्तीनेच सामना दिला पाहिजे, असे शिवरायांनी ठरवले. ते जिजामातेशी सल्लामसलत करून, तसेच त्यांचा आशीर्वाद घेऊन राजगडावरून निघाले आणि त्यांनी प्रतापगडाकडे कूच केले.

अफजलखानाचे डावपेच 

शिवराय प्रतापगडावर गेले, ही बातमी खानाला कळताच तो चिडला. त्याला माहीत होते, प्रतापगडावर चालून जाणे सोपे नाही, कारण तो किल्ला होता डोंगरात. भोवताली घनदाट जंगल होते. वाटेत उंचउंच डोंगर होते. फौजेला जायला चांगली वाट नव्हती. तोफा चढवायला मार्ग नव्हता. शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर भयंकर सुळसुळाट !

शिवरायांनी प्रतापगडावरून उतरून खाली यावे, म्हणून खानाने डावपेच खेळण्यास सुरुवात केली. तुळजापूर, पंढरपूर या देवस्थानांना उपद्रव दिला. रयतेचा खूप छळ केला. हे ऐकून तरी शिवराय प्रतापगड सोडतील व बाहेर येतील, असा खानाचा डाव होता.

शिवरायांनी खानाचा डाव ओळखला. त्यांनी प्रतापगड सोडलाच नाही, तेव्हा खानाने दुसरा डाव टाकला. प्रेमळपणाचे सोंग घेऊन त्याने शिवरायांना निरोप पाठवला, ‘तुम्ही माझ्या मुलासारखे. मला भेटायला या. आमचे किल्ले परत दया. तुम्हांला मी आदिलशाहाकडून सरदारकी देववितो.’

शेरास सव्वाशेर 

खान आपल्याशी कपटी डाव खेळतो आहे, हे शिवरायांनी झटकन ओळखले. ते सावधगिरीने वागत होते. त्यांनी खानालाच प्रतापगडाखाली खेचून आणण्याचा निर्धार केला. त्यांनी खानाला निरोप पाठवला, ‘खानसाहेब, मी तुमचे किल्ले घेतले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा. आपणच प्रतापगडाखाली भेटायला यावे. मला तिकडे येण्याची भीती वाटते.’

शिवरायांचा निरोप ऐकून अफजलखान हसला. ‘वा! बहोत खुशी!’ आपली दाढी कुरवाळत तो म्हणाला. त्याला वाटले, या अफजलखानापुढे शिवाजीची काय बिशाद ! हा डरपोक माझ्याशी कसली लढाई खेळतो ! आपणच जावे आणि भेटीत त्याला चिरडून टाकावे. बस्स ! खान शिवरायांना प्रतापगडाखाली भेटायला तयार झाला.

भेट ठरली 

Bhawani-Mata-Pratapgad

प्रतापगडाखालच्या माचीवर भेटण्याची जागा ठरली, दिवस ठरला, वेळ ठरली. भेटीच्या वेळी दोघांनी आपल्याबरोबर एक-एक सेवक आणावा आणि आपले दहा अंगरक्षक ठरलेल्या ठिकाणी दूर ठेवावे, असे ठरले. महाराजांनी खानासाठी चांगली वाट तयार करवून घेतली. भेटीसाठी छानसा शामियाना उभारला.

शिवराय फार सावधगिरीने वागत होते. त्यांनी आपल्या सैन्याच्या निरनिराळ्या तुकड्या केल्या. जंगलात कोणी कोठे लपून राहायचे, काय करायचे, याबद्दल त्यांना सूचना दिल्या. कडेकोट बंदोबस्त केला. खान कपटी आहे, शिवरायांनी त्याची भेट घेऊ नये, असे त्यांना काही सल्लागारांनी सांगितले, पण शिवरायांनी खानाला भेटायचे नक्की ठरवले.

भेटीची तयारी 

Hatyare

भेटीचा दिवस उजाडला. सकाळी शिवरायांनी भवानीदेवीचे दर्शन घेतले. थोड्या वेळाने त्यांनी पोशाख करण्यास सुरुवात केली. पायांत सुरवार चढवली. अंगात चिलखत घातले. त्यावर जरीचे कुडते व अंगरखा घातला. डोक्यास जिरेटोप घातला. त्यावर मंदील बांधला. डाव्या हाताच्या बोटांत वाघनखे चढवली. त्याच हाताच्या अस्तनीत बिचवा लपवला. सोबत पट्टा घेतला. शिवराय खानाच्या भेटीसाठी असे तयार झाले.

बाहेर सरदार उभे होते. शिवराय त्यांना म्हणाले, “गड्यांनो, आपापली कामे नीट करा. भवानीआई यश देणार आहे, पण समजा आमचे काही बरेवाईट झाले, तर तुम्ही धीर सोडू नका. संभाजीराजांना गादीवर बसवा. मासाहेबांच्या आज्ञेत वागा. स्वराज्य वाढवा. रयत सुखी करा. आम्ही निघालो !” शिवराय निघाले. बरोबर वकील पंताजी गोपीनाथ आणि जिवाजी महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सिद्दी इब्राहिम इत्यादी दहा अंगरक्षक होते.

खान शिवरायांच्या आधीच शामियान्यात येऊन बसला होता. मनोराज्य करत होता. त्याच्या शेजारी बडा सय्यद नावाचा त्याचा हत्यारबंद शिपाई उभा होता. तो पट्टा चालवण्यात मोठा पटाईत होता. शिवराय शामियान्याच्या दाराजवळ आले. बड़ा सय्यदकडे पाहताच ते तेथेच उभे राहिले. खानाने महाराजांच्या वकिलाला विचारले, “शिवाजीराजे आत का येत नाहीत ?”

” वकील म्हणाला, “ते बड़ा सय्यदला भितात. त्याला तेवढा दूर करा !” बडा सय्यद दूर झाला. शिवराय आत गेले. खान उठून म्हणाला, “या, राजे, भेटा आम्हांला.”

अफजलखानाशी झटापट 

Shivaji-Maharaj-ani-Afjalkhan

महाराज सावध होऊन पुढे झाले. खानाने शिवरायांना आलिंगन दिले. धिप्पाड़ खानापुढे शिवराय ठेंगणे होते. शिवरायांचे मस्तक खानाच्या छातीवर आले. त्यासरशी खानाने शिवरायांना ठार करण्यासाठी त्यांची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली आणि दुसऱ्या हाताने शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला. शिवरायांच्या अंगावरील अंगरखा टर्रकन फाटला. अंगरख्याखाली चिलखत असल्यामुळे शिवराय बचावले.

त्यांनी खानाचा डाव ओळखला. अत्यंत चपळाईने त्यांनी खानाच्या पोटावर वाघनखांचा मारा केला. डाव्या हाताच्या अस्तनीत लपवलेला बिचवा उजव्या हाताने काढून त्यांनी तो खसकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर पडली. खान कोसळला. एवढ्यात त्याचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे आला. त्याने शिवरायांवर तलवारीचा वार केला, पण शिवरायांनी पट्ट्याच्या एका घावात त्याला ठार केले.

ही खणाखणी ऐकून बड़ा सय्यद शामियान्यात घुसला. तो शिवरायांवर वार करणार, एवढ्यात जिवाजी महाला धावून आला. बडा सय्यदचा वार आपल्या अंगावर घेऊन जिवाजी महालाने एका घावात त्यास जागच्या जागी ठार केले. ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’, अशी म्हणच पुढे रूढ झाली. या वेळी झालेल्या संघर्षात संभाजी कावजीने मोठा पराक्रम केला.

अफजलखानाच्या फौजेची दाणादाण

विजयी शिवराय गडावर गेले. इशाऱ्याची तोफ झाली. शिवरायांचे सैन्य इशाऱ्याची वाटच बघत होते. तोफ होताच झाडीत लपून राहिलेले शिवरायांचे सैन्य खानाच्या फौजेवर तुटून पडले. खानाच्या फौजा बेसावध होत्या. त्यांना पळायलाही वाट सापडेना.

मराठ्यांनी जोराचा पाठलाग केला आणि खानाच्या फौजेचा धुव्वा उडवला. अफजलखानाचा मुलगा फाजलखान कसाबसा निसटला व विजापूरला पोहोचला. त्याने सांगितलेली बातमी ऐकून विजापुरात हाहाकार उडाला.

विजापूरचा सर्वांत बलाढ्य सरदार शिवरायांनी हां हां म्हणता धुळीस मिळवला. शिवरायांचे नाव सगळीकडे दुमदुमले. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे सह्याद्रीच्या कडेकपारीतून घुमू लागले.



MPSC Online

 

Leave a Comment