परिवलन
करून पहा.
एक भोवरा घ्या. तो फिरवून त्याचे निरीक्षण करा.
भोवरा स्वतःभोवती फिरतो. स्वतःभोवती फिरणारी कोणतीही वस्तू प्रत्यक्षात एका अदृश्य रेषेभोवती फिरत असते. वस्तूच्या स्वतः) तःभोवती फिरण्याला ‘परिवलन’ म्हणतात, तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा ‘अक्ष’ किंवा ‘आस’ म्हणतात.
पृथ्वीचे परिवलन
करून पहा.
एक पृथ्वीगोल घ्या. तो फिरवून पहा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. आता एक ओळंबा घेऊन चित्रात दाखवल्याप्रमाणे पृथ्वीगोलाजवळ धरा. ( ओळंबा उपलब्ध नसल्यास खोडरबरला दोरा बांधून ओळंबा तयार करा.)
ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल, म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे. अशा अक्ष कललेल्या स्थितीमध्येच पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. ही रेषा पृथ्वीच्या मध्यबिंदूतून जाते. NaS या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात.
N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे, तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवांच्या मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला ‘विषुववृत्त’ म्हणतात. वरील पृथ्वीगोल पहा. विषुववृत्तामुळे होणाऱ्या पृथ्वीच्या दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात.
करून पहा.
एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्तीभोवती एक मोठे वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बियर पृथ्वीगोल ठेवा बी पेटवा. खोलीत अंधार करा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा.
पृथ्वीगोलाकडे उत्तर ध्रुवाकडून पहा आणि घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवा. आपली पृथ्वी ही स्वतःभोवती याच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वीचे ‘भाग क्रमाक्रमाने उजेडात येतात आणि त्याच क्रमाने उजेडापासून दूर जातात. ज्या भागावर उजेड पडतो तेथे दिन आहे, तर जेथे उजेड पडत नाही तेथे रात्र आहे, असे आपण म्हणतो.
सूर्योदय आणि सूर्यास्त
करून पहा.
एक लाल रंगाची टिकली घ्या. ती पृथ्वीगोलावर चिकटवा. वरील प्रयोगाप्रमाणेच पृथ्वीगोल व मेणबत्ती घेऊन प्रयोग करा. पृथ्वीगोल घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेनेच फिरवा. लाल टिकलीवर पृथ्वीगोलाच्या कोणत्या स्थितीत सूर्योदय, मध्यान्ह आणि सूर्यास्त होईल याचे निरीक्षण करा.
लाल टिकलीवर एकदा सूर्योदय झाल्यानंतर पुन्हा सूर्योदय केव्हा होतो ते पहा. जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेले असते, तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो. हे तुमच्या लक्षात येईल. पृथ्वीच्या एका परिवलनाच्या या कालावधीला आपण एक दिवस म्हणतो. एका दिवसाचे एक दिन आणि एक रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण २४ समान भाग करून प्रत्येक भागाला १ तास म्हणतो.
वर्ष
करून पहा.
पृथ्वीगोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरता ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वीगोल पुन्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल. याचप्रमाणे पृथ्वीही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण’ करत असते.
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला ‘वर्ष’ म्हणतात. एका वर्षात सुमारे ३६५ दिवस आणि ६ तास असतात.
चंद्राच्या कला
सांगा पाहू !
(१) आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात ?
(२) पौर्णिमेला चंद्र कसा दिसतो? अमावस्येला चंद्र कसा दिसतो ?
पौर्णिमा आणि अमावास्या
चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते; परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एकाच सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा पृथ्वीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते.
चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पृथ्वीकडील पूर्ण भाग दिसतो. अमावास्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत वाढत जातो. यालाच आपण ‘चंद्राच्या कला’ म्हणतो.
चांद्रमास आणि तिथी
अमावास्येनसून पौर्णिमेपर्यंतच्या पंधरा दिवसांच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत.. अमावास्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येण्यास चंद्राला १४ किंवा १५ दिवस लागतात. या पंधरवड्याला ‘शुक्लपक्ष’ म्हणतात. पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो.
१४-१५ दिवसांनी पुन्हा अमावास्या येते. या पंधरवड्याला ‘कृष्णपक्ष ‘ म्हणतात. अशा प्रकारे एका अमावास्येपासून पुढच्या अमावास्येचा काळ सुमारे २८ ते ३० दिवसांचा असतो. या काळाला ‘चांद्रमास’ म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला ‘तिथी’ म्हणतात.