राष्ट्रीय सभेची स्थापना

राष्ट्रीय जागृती होऊ लागल्यामुळे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांत राजकीय चळवळी सुरू झाल्या होत्या. त्याला अखिल भारतीय स्वरूप देण्याचे प्रयत्नही या काळात सुरू झाले. ‘इंडियन असोसिएशन’ या संघटनेने कोलकता येथे अखिल भारतीय परिषद भरवली. या प्रयत्नांतून राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची कल्पना पुढे आली.

दादाभाई नौरोजी, बद्रुद्दीन तय्यबजी, फिरोजशहा मेहता इत्यादी भारतीय नेत्यांना असे वाटू लागले, की राष्ट्रीय पातळीवर एखादी संघटना असावी. त्यांनी निवृत्त ब्रिटिश अधिकारी सर अॅलन हयूम यांच्या सहकार्याने ‘इंडियन नॅशनल काँग्रेसची म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना केली.

राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन : राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे भरले होते. दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, पी. रंगय्या नायडू, गोपाळ गणेश आगरकर इत्यादी नेते त्यात सहभागी होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी व्योमेशचंद्र बॅनर्जी होते. अधिवेशनात देशापुढील अनेक समस्यांवर चर्चा करण्यात आली.

या पुढील काळात राष्ट्रीय सभेची अधिवेशने प्रत्येक वर्षी निरनिराळ्या शहरांत भरू लागली. राष्ट्रीय सभेला लोकांचा पाठिंबा वाढत गेला. सर्व धर्मांच्या लोकांना राष्ट्रीय चळवळीत एकत्र आणण्याचा राष्ट्रीय सभेचा प्रयत्न होता.भारतीयांची ही एकजूट ब्रिटिश सरकारला धोकादायक वाटू लागली.

शासकीय सेवेत असलेल्या भारतीयांनी राष्ट्रीय सभेच्या सभांना हजर राहू नये, असा नियम सरकारने केला. मुस्लिम समाजाने राष्ट्रीय सभेत सहभागी होणे त्यांच्या हिताचे नाही, असा प्रचार ब्रिटिशांनी सुरू केला; परंतु याचा फारसा परिणाम बहुद्दीन तय्यबजी यांच्यासारख्या नेत्यांवर झाला नाही.

ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांची होणारी पिळवणूक आणि त्यांचे वाढते दारिद्र्य यांवर राष्ट्रीय सभेने आपले लक्ष केंद्रित केले. सरकारी नोकऱ्यांत भारतीयांना स्थान मिळावे, शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी करावा, अशा प्रकारच्या मागण्या त्यांनी केल्या.

मवाळ व जहाल गट : राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळात तिचे नेतृत्व पूर्णपणे नेमस्तांच्या म्हणजे मवाळांच्या हाती होते. सरकारला निवेदने, अर्ज-विनंत्या केल्यास ते आपल्या मागण्या मान्य करेल, यावर त्यांचा विश्वास होता. सनदशीर मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला. गोपाळ कृष्ण गोखले हे नेमस्तांचे अग्रणी होते.

अर्ज-विनंत्यांचा विचार करून ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या मान्य करेल, ही भारतीयांची आशा फोल ठरली. त्यामुळे राष्ट्रीय सभेतील काही तरुण अस्वस्थ होऊ लागले. नेमस्तांच्या मार्गाने जाऊन राजकीय चळवळ पुढे नेता येणार नाही, असे त्यांना वाटू लागले.

केवळ अर्ज विनंत्या करून भागणार नाही, तर समाजातील सर्व लोकांमध्ये जागृती निर्माण केली पाहिजे, स्वराज्यासाठी प्रखर देशभक्ती निर्माण झाली पाहिजे, जनतेने आपले हक्क संघटित होऊन, झगडून मिळवले पाहिजेत, यांवर त्यांचा विश्वास होता. अशी विचारसरणी असणाऱ्यांना ‘जहाल’ असे म्हणतात.

अशा तरुणांचे नेतृत्व लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांनी केले. लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली. या वृत्तपत्रांतून ते भारतीय जनतेला आपल्या हक्कांची जाणीव करून देऊ लागले. सार्वजनिक गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव यांच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली. आपल्या लिखाणातून व भाषणांतून लोकांना निर्भय व स्वाभिमानी बनण्यास शिकवले.

Leave a Comment