साम्राज्याची वाटचाल

आतापर्यंत आपण मराठी सत्तेचा उदय व विस्तार पाहिला. स्वराज्य स्थापनेपासून ते साम्राज्यापर्यंतचा प्रवास कसा कसा झाला ते आपण अभ्यासले. मराठ्यांचा उत्तर भारतात जो साम्राज्यविस्तार झाला, त्यासाठी ज्या सरदार घराण्यांनी महत्त्वाचे योगदान दिले त्यांचा थोडक्यात आढावा आपण या पाठात घेणार आहोत.

इंदौरचे होळकर 

मल्हारराव हे इंदौरच्या होळकरांच्या सत्तेचे संस्थापक. त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली. गनिमी काव्याच्या युद्धपद्धतीत ते निष्णात होते. पहिला बाजीराव व नानासाहेब पेशवा यांच्या काळात त्यांनी उत्तरेत पराक्रम गाजवला. माळव्यात आणि राजपुतान्यात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांचा मोठा वाटाहोता.

पानिपतानंतर उत्तरेतील मराठ्यांची मल्हारराव होळकर प्रतिष्ठा सावरण्यास माधवराव पेशव्यास त्यांची फार मदत झाली.पुण्यश्लोक अहिल्याबाई मल्हाररावांचा या पुत्र खंडेराव यांच्या पत्नी होत.कुंभेरीच्या खंडेरावांचा युद्धात मृत्यू झाला. काही काळाने मल्हारराव यांचेही निधन झाले.

त्यानंतर इंदौरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाईंच्या हाती आली. त्या थोर, मुत्सद्दी आणि उत्कृष्ट प्रशासक होत्या. त्यांनी नवे कायदे करून शेतसारा, करवसुली अशा गोष्टींची घडी बसवली.पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, शेतकऱ्यांना विहिरी खोदून देणे, व्यापार-उदयोगाला प्रोत्साहन देणे, तलाव तळी निर्माण करणे यासाठी त्या झटल्या.

भारतात चारी दिशांना असलेल्या महत्त्वाच्या धर्मस्थळांवर त्यांनी मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोया यांची उभारणी केली.देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा त्यांचा हा प्रयत्न फार महत्त्वाचा होता. त्या स्वतः न्यायनिवाडे करत. त्या दानशूर आणि ग्रंथप्रेमी होत्या.

त्यांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे समर्थपणे राज्याचा कारभार करून उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेची प्रतिमा उंचावली. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. मराठेशाहीच्या उतरत्या काळात यशवंतराव होळकर यांनी राज्य वाचवण्याचा प्रयत्न केला.

नागपूरचे भोसले 

नागपूरकर भोसल्यांच्या घराण्यातील परसोजी भोसले यांना महाराजांच्या शाहू काळात वन्हऱ्हाड व गोंडवन या प्रदेशांची सनद देण्यात आली. नागपूरकर भोसल्यांपैकी रघूजी हे सर्वांत कर्तबगार व रघूजी भोसले पराक्रमी पुरुष होते. त्यांनी दक्षिणेतील तिरुचिरापल्ली व अर्काट यांच्या आसपासचा प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आणला.

बंगाल, बिहार व ओडिशा प्रांतांच्या चौथाईच्या वसुलीचे अधिकार शाहू महाराजांनी त्यांना दिले होते. त्यांनी ते प्रदेश मराठ्यांच्या प्रभावाखाली आणले. इ.स.१७५१ मध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिशा सुभा अलीवर्दीखानाकडून जिंकून घेतला. पुढे इ.स. १८०३ पर्यंत मराठ्यांचे प्रभुत्व ओडिशावर होते.

ग्वालियरचे शिंदे

थोरल्या बाजीरावाने राणोजी शिंदे याचे कर्तृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमले. राणोजीच्या मृत्यूनंतर जयाप्पा, दत्ताजी महादजी या व त्याच्या मुलांनीही पराक्रम गाजवून उत्तर भारतात मराठ्यांची सत्ता प्रबळ केली.माधवराव पेशव्याने शिंदे घराण्यातील सरदारकी महादजींना दिली.

ते पराक्रमी आणि मुत्सद्दी होते. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी त्यांनी केली. उत्तर भारताच्या सपाट प्रदेशात मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धपद्धती उपयुक्त ठरणार नाही, हे त्यांनी ओळखले.

त्यांनी डिबॉईन फ्रेंच लष्करी तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि तोफखाना सुसज्ज केला. या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना नमवले.पानिपतच्या लढाईमुळे मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे, असे पाहून इंग्रजांनी दिल्लीच्या राजकारणात भाग घेणे सुरू केले.

त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार स्वतःकडे घेतले. ते दिल्लीच्या बादशाहाला स्वतःच्या ताब्यात घेऊ इच्छित होते. अशा विपरीत परिस्थितीत महादजी शिंदे यांनी इंग्रजांवर मात करून बादशाहाला पुन्हा गादीवर बसवले. या कामगिरीवर खूश होऊन बादशाहाने त्यांना ‘वकील-इ-मुल्लक’ हे पद देऊ केले.

याचा अर्थ त्यांना दिवाणी आणि लष्करी अधिकाराची मुखत्यारी देऊ केली. त्यांनी ते पद बाल पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीने स्वीकारले. या पदामुळे दिल्लीची पातशाही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात आली. कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सावरणे हे सोपे काम नव्हते.

महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इ.स. १७८४ ते १७९४ या काळात दिल्लीचा कारभार पाहिला.पानिपतच्या लढाईस जबाबदार असलेल्या नजीबखानाचे वारसदार अद्याप रोहिलखंडात कारस्थाने करतच होते.

नजीबाचा नातू गुलाम कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन पैशासाठी बादशाहाचा आणि बेगमांचा छळ केला. बादशाहाचे डोळे काढले आणि खजिना बळकावला. अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा पराभव केला. त्याने बळकावलेली संपत्ती जप्त केली आणि ती बादशाहाला परत केली.

बादशाहाची दिल्लीच्या गादीवर पुनःस्थापना केली. अशा रीतीने महादजींनी पानिपतच्या लढाईनंतर मराठ्यांची पत परत मिळवून दिली. दिल्लीच्या बादशाहाला मराठ्यांच्या ताब्यात ठेवून भारताचे राजकारण चालवले.पेशव्यांच्या गृहकलहाचा एक परिणाम म्हणून रघुनाथराव इंग्रजांच्या आश्रयाला गेला होता.

इंग्रजांच्या मदतीने पेशवेपद मिळवण्याचा त्याचा इरादा होता. मराठी मुत्सद्द्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे मराठे आणि इंग्रज यांच्यातील संघर्ष अटळ ठरला. मात्र त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की हिंदुस्थानवर राज्य कोणी करायचे याचा अंतिम निर्णय मराठे आणि इंग्रज या दोन महासत्तांमधील संघर्षातूनच होणार होता.

मुंबईहून इंग्रज बोरघाटमार्गे मराठ्यांवर चालून आले. महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठी सेना एकवटली. गनिमी कावा पद्धतीचा वापर करून मराठ्यांनी इंग्रजांना धान्यसामग्री मिळू दिली नाही. उभय सैन्याची गाठ वडगाव (सध्याच्या पुणे-मुंबई रस्त्यावर) येथे पडली.

या लढाईत इंग्रजांचा पराभव झाला आणि त्यामुळे रघुनाथरावाला मराठ्यांच्या ताब्यात देणे इंग्रजांना भाग पडले.दिल्लीवर इ.स. १८०३ पर्यंत मराठ्यांचे नियंत्रण होते. इंग्रजांनी भारत जिंकला, तो मराठ्यांशी लढाया करून, हे लक्षात घेतले म्हणजे महादजींच्या कामगिरीचे मोल लक्षात येते.

दिल्लीच्या कारभाराची व्यवस्था लावून ते पुण्यात आले. पुण्याजवळ वानवडी येथे त्यांचा मृत्यू झाला. तेथे त्यांच्या स्मरणार्थ छत्री उभारली आहे.सेनापती खंडेराव दाभाडे व त्याचा पुत्र त्रिंबकराव यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेची पायाभरणी केली. 

खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचे पारिपत्य केले. तेथील किल्ला जिंकून घेतला. पुढे गायकवाडांनी गुजरातमधील वडोदरा हे आपल्या सत्तेचे केंद्र केले. मध्यप्रदेशातील धार आणि देवासच्या पवारांनी शिंदे व होळकर यांना उत्तरेत मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार करण्यात मोलाचे साहाय्य केले.

माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी विस्कटली होती. ती नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी व्यवस्थित बसवली. महादजी उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व स्थापण्यात गुंतलेले असताना नाना फडणवीस याने दक्षिणेकडील राजकारणाची सूत्रे सांभाळली.

या कार्यात पटवर्धन, हरिपंत फडके, रास्ते इत्यादी सरदारांनी त्याला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांच्या सत्तेचे दक्षिणेत वर्चस्व स्थापन झाले. इंदौरचे होळकर,नागपूरचे भोसले, ग्वालियरचे शिंदे, वडोदऱ्याचे गायकवाड यांनी पराक्रम, नेतृत्व, कर्तबगारी इत्यादी गुणांच्याद्वारे मराठ्यांच्या सत्तेला वैभव प्राप्त करून दिले.

ते मराठ्यांच्या सत्तेचे अखेरच्या टप्प्यातले आधारस्तंभ होते.उत्तर व दक्षिण भारतात मराठ्यांच्या सत्तेचे प्रभुत्व निर्माण करण्यात मराठा सरदार यशस्वी झाले. महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मात्र या सत्तेला उतरती कळा लागली.

या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता. त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते. उलट, अनेक दोषच होते. तो मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली.

अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला. मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली.इंग्रजांनी इ.स.१८१७ मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे ‘युनियन जॅक’ हा आपला ध्वज फडकवला.

इ.स. १८१८ मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली. ही घटना भारताच्या इतिहासात एक मोठा बदल घडवणारी ठरली. या घटनेनंतर इंग्रजांनी बहुतांश भारत आपल्या आधिपत्याखाली आणला.

भारताचा पाश्चात्त्य जगाबरोबर संबंध वाढला. त्याबरोबर भारतीय समाजव्यवस्थेत अनेक बदल झाले. अनेक जुन्या गोष्टी निष्प्रभ झाल्या वा बाजूला सारल्या गेल्या. एक मोठे स्थित्यंतर झाले. भारताच्या इतिहासातील मध्ययुग संपले. आधुनिक कालखंडाला सुरुवात झाली.

Leave a Comment