Sant Gadge Baba Information in Marathi
कर्मयोगी, स्वच्छतेचे अग्रदूत, सत्यशोधनकार, समाज सुधारणावाद विज्ञाननिष्ठ, आधुनिक विचारांचा महामेरू असलेल्या कर्मयोगी संत गाडगे बाबांचा जन्म दि. २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेंडगांव या छोट्याशा गावी झाला. त्यांच्या आईचे नाव सखूबाई व वडिलाई झिंगराजी जाणोरकर होते. लहानपणी त्यांना डेबू म्हणत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
गाडगे बाबांच्या घरची परिस्थिती अतिशय हलाकीची, त्यातच वडिलांना दारूचे व्यसन जडले त्यामुळे दरिद्री जीवन गाडगे बाबांच्या वाट्याला आले होते. होती ती जमीन दारूच्या व्यसनामुळे वडिलांनी विकून टाकली. या व्यसनामुळे झिंगराजीचे आरोग्य बिघडले. शेंडगाव जवळच असलेल्या घोडसगाव येथील झिंगराजीव मावसभाऊ यादवजी आणि जयरामजी यांनी या पतित कुटुंबाला आपल्याकडे नेले.
येथेच झिंगराजींचा इ.स. १८८४ मध्ये मृत्यू झाला. झिंगराजीने मृत्यूपूर्वी सखूबाईला म्हटले होते, “सखू महा कारभार आटपला! मराले शेवटी मी लोकांच्या उंबरठ्यात येऊन पळलो ! मेल्यावर मले जायाले पैसा लोकांचाच कायनं आली आसिल हे अवदसा? देवकाऱ्याच्या दारूनं! कांहाचे हे देव अन् कांहाचे ते दगळा गोट्याईचे देवकोर? दारूच्या पाई घरदार, वावर, मान मयराद्याले सोळल्यानं आपल्या संसाराचे कोयसे झाले.
आता माजं आईक. आताच्या आता तो खंडोबा, ती आसरा अन् ते सर्वेच्या सर्व देवपाटातले दगड गोटे दे फेकून भूलेश्वरीत. आखीन एक काम, वर आपल्या लाडाच्या डेबुले वारा नोका लागू दिऊ त्या देवदेवीचा. निर्मळ राहू दे त्याले. या देवदेवी अन् देवकाऱ्याच्या पापापासून. अरे काहाचे हे धरम अन् कुयघरम?
या खोट्या देवाईले कोंबडे बकऱ्यााईले इनाकारन कापण्याच्या पापी फंदात मी पळलो नसतो त दारूच्या नादात कायले गोयलो असतो? लोकाइले काम्हून बदलामी देवाव? माझ्या जोळ पैशाईचा आसरा होता. तथुरोक मले त्याहीनं दारूसाठी कोरलं लोक असेचअसतात सखू, पण आता माह्या डेवुले सांभाळजो बरं? तो पिसाट, देवाले न माननारा झाला तरी बरं होईल.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
पण त्याले या बकरे खाऊ अन् दारू पिऊ देवाचा नाद लागू देऊ नोका बरं?” नंतर हे कुटुंब मूर्तीजापूर तालुक्यातील ‘दापूरी’ या मामाच्या (चंद्रमानजी) आले. गाडगे बाबांचे मामा सघन कास्तकार होते. गाडगे बाबा मामाच्या घरी गुरे राखायचे, शेती करायचे. त्यांची प्रकृती दणकट व निरोगी होती. ते रानामध्ये गुरे चारायला न्यायचे तेव्हां आपल्या सवंगड्यांसह भजन, कीर्तन करीत गुराख्यांचे सहभोजन घडवून आणीत.
त्यांना गोष्टी ऐकण खूप आवडायचे. त्यांचे आजोबा (हंबीरराव) व आई त्यांना संस्कारक्षम गोष्टी सांगत. तसेच त्यांच्या मामी सुरेख आवाजात अभंग गायच्या. गाडगे बाबा ते ऐकून पाठ करीत. गाडगे बाबा शेती उत्तम प्रकारे करीत. “कायावाचा मने करून केलेल्या सेवेच्या भक्तीतून बिनचूक प्रसन्न होणाऱ्या शेतीशिवाय दुसरा परमेश्वर नाही.”
हा सिद्धांत याच वयात मनोमन पटला आणि येथेच त्यांच्या भावी चारित्र्याच्या उज्ज्वल कामगिरीचा पाया भक्कम बसला. इ.स. १८९२ मध्ये कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची मुलगी कुंताबाई (वय ७ ते ८ वर्ष) सोबत गाडगे बाबांचा विवाह झाला. याच काळात मामा चंद्रभानजी यांचा सावकाराच्या कर्जाच्या दडपणाने मृत्यू झाला. परंतु गाडगे बाबांनी संसाराची जबाबदारी सांभाळून सावकाराचे कर्जही फेडले.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
Click on below links to read more | अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Lokmanya Tilak – लोकमान्य टिळक
मात्र सावकाराने ( बनाजी प्रिथमजी तिडके) कागदपत्री लबाडी करून मामाच्या नावावरील कर्ज तसेच कायम ठेवले. गाडगे बाबांनी या सावकारासोबत संघर्ष करून मामाची जमीन सावकाराच्या तावडीतून सोडवली. या प्रसंगापासून पंचक्रोशीतील शेतकरी गाडगे बाबांना मान देऊ लागले. ते गाडगे बाबांना देवीसिंग या बहुमानवाचक नावाने संबोधित. गाडगे बाबांनी याच काळात लोकसेवेला प्रारंभ केला.
नदीकाठचे रस्ते पावसाळ्यात नादुरूस्त झाले की ते स्वत: कुदळी, फावडे घेऊन दुरूस्त करायचे. कुठे कचरा दिसला, घाण दिसली की साफ करायचे. प्रारंभी इतर लोक आश्चर्याने पाहायचे नंतर ते सुद्धा गाडगे बाबांसोबत कामाला लागायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्व मिळून एकजुटीने करायला हवी हा धडा मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवित. एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीने लाकडाची गाठ फुटत नसेल ती फोडून द्यायचे.
ओझ्याखाली वाकलेल्यामुल असलेल्या बाईचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन घरापर्यंत नेऊन द्याय असे कार्य करत असताना मीपणाचा अहम् भाव कुठेच नव्हता. वाईट दिसेल तेथे आपणाहून चांगले करावे. कोणाचे काही अडले नडले तर तो कोण आहे हा विचार न करता स्वतः जाऊन सावरावे. “उणे दिसे ते पूर्ण करी। जगाचा तोल बोघे सावरी ।। याप्रमाणे गाडगे बाबांचे कार्य चालायचे. गाडगे बाबांना अलोका, कलावती, मुदूगल (लहान असतानाच मृत्यू ), गोविंदा ही मुलं होती.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
विभूतीची भेट व परिवर्तन : शेतामध्ये खरीप व रब्बीची पिके भरघोस आली होती. पाखरे हुसकवण्यासाठी गाडगे बाबा मंचावर उभे राहून पाखरे हाकीत होते. त्यावेळी धिप्पाड बांधा, दणकट देहयष्टी, चमकती अंगकाठी, दाढी-मिशा जटाभार वाढलेल्या अंगावर लक्तराची फक्त एक लंगोटी, अनवाणी चालत शेतातील ज्वारीची कच्ची कणसे खात एक व्यक्ती तेथे आला.
तेव्हां गाडगे बाबांनी समोर जाऊन नमस्कार घातला व गाडगे बाबा म्हणाले, “आपको कुछ चाहिए?” तेव्हां ती व्यक्ती म्हणाली “आप क्या दोगे? मेरे पास सब है। तू क्या मंगता है? मैं दे सकता हूँ, मंगता है कुछ? चल हमारे साथ आता है?” दोघेही नदीच्या किनारी गेल्यावर गाडगे बाबांनी त्या व्यक्तीला भोजन करण्याची विनंती केली व खैरी गावातून खाण्याचे साहित्य आणले.
भोजन झाल्यानंतर दोघेही दापूरी स्मशानातल्या शिवलिंगाच्या वट्यावर जाऊन बसले. त्यांच्यामध्ये रात्रभर चर्चा चालली. दुसऱ्या दिवशी गाडगे बाबा घरी आले व जरूरीचे काम निघाले म्हणून बैलगाडी जोडून दर्यापूरला निघून गेले. त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास तो व्यक्ती “डेबीदास, डेबीदास” अशा मोठमोठ्याने हाका मारीत गावात फिरू लागला.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
परंतु दरोडेखोरांचा सुगावेदार असावा म्हणून पाटलाने त्याला सीमापार हुसकावून दिले. ही बातमी गाडगे बाबांना परत आल्यानंतर कळली. त्यांनी त्या व्यक्तीला आसपासच्या गावांमध्ये पाहिले, परंतु ती व्यक्ती निघून गेली होती. या घटनेनंतर बाबांच्या मनात आपल्या गरजा शून्य करून समाजसेवा व समाज जागृतीबाबत विचार डोकावू लागला. (प्रबोधनकार के. सी. ठाकरे यांनी “श्री संत गाडगे बाबा” या पुस्तकामध्ये लिहिले आहे की, बाबांना या विभूतीचेविषयी विचारलेतर ‘छे अशी कोणी विभूती मला भेटलीच नाही” असे ते सांगत होते.
गृहत्याग : गाडगे बाबांच्या मनामध्ये वैराग्य व परमार्थाचे विचार घोळत असतानाच त्यांनी गृहत्याग करण्याचा निश्चय केला. १ फेब्रुवारी १९०५ च्या रात्री आईला वंदन करून अंगावर फक्त एक फाटके धोतर, एक फुटके मडके व एक काठी घेऊन सर्वस्वाचा त्याग करून घराबाहेर पडले. आजपर्यंत अनेकांनी संसार त्याग केला आहे, त्याची कारणे अठराविश्वे दारिद्र्य, कर्जाचे ओझे, मुलाबाळांचे मृत्यू, पती-पत्नीतील वाद, कुटुंबात नि समाजात नित्य होणारी हेटाळणी, बेकारी यापैकी कोणते न कोणते कारण असते.
सर्व सुख असताना संसार त्याग करण्याचे उदाहरणे अपवादात्मक आहेत. गाडगे बाबांना वरील एकही कारण लागू पडत नाही. प्रामाणिकपणे कष्ट करून आजोबांची शेतीवाडी कर्जाच्या पाशातून मुक्त करून सुधारली होती. घरात जीवापाड प्रेम करणारी माणसं अशा भरभराटीच्या संसाराचा गाडगे बाबांनी केलेला त्याग म्हणजे कपिलवस्तु येथील सिद्धार्थ राजपुत्राने निर्वाणाचा शोध लावण्यासाठी केलेल्या प्राचीन अजरामर इतिहासाची पुनरावृत्ती म्हटली पाहिजे.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
संसार त्याग का केला? : गाडगे बाबांनी वयाच्या २८ वर्षापर्यंत समाजजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण केले होते. शेतकरी, कामकरी आदी मागासलेले वर्ग रक्ताचे पाणी करून सुद्धा कमालीच्या दारिद्र्यात किड्या-मुंग्यांसारखे जीवन जगत. सावकारादी वरच्या वर्गातील लोक त्यांना यंत्रासारखे जुंपून त्यांच्या कष्टाची फळे आपण मटकावीत होते. श्रमजीवी वर्गाला तर आपले शोषण होत आहे याचीही जाणीव नव्हती.
कारण दैववादाचा पगडा त्याच्या मेंदूत भिनवल्या गेला होता. ही परिस्थिती बदलविण्याकरिता गाडगे बाबांनी संसार त्याग केला होता. तसेच गाडगे बाबांनी धर्माच्या नावाखाली चाललेला अधर्म खुल्या डोळ्यांनी पाहिला होता. म्हणूनच अनेक साधुसंतांनी मोक्ष प्राप्तीकरिता संसाराचा त्याग केला व तशी शिकवण आपल्या शिष्यांना दिली असतानाही मोक्ष मुक्तीचे आणि हरिनाम अमरगाचे भवसागर तरून जाण्याचे आध्यात्मिक खुळ कधीच गाडगे बाबांना हले नाही.
‘जिवंत असता उपाशी मरा नि स्वर्गातील अमृताकरिता जवळ असे ते दान करा” या विचारसरणीला त्यांना बदलायचे होते. गाडगे बाबांचादेवधर्माच्या भावनांवर नि कल्पनांवर विश्वास नव्हता. धर्माच्या नावाखाली रूट असलेल्या अनेक दुष्ट चालीरितीच्या विरूद्ध त्यांना बंड करायचे होते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
दारू रेड्या-बोकड्यांच्या कटूरीशिवाय देवाची शांती नाही आणि धर्माची भूक भागत नाही, भजन कीर्तनाचा थाट केवळ मनाच्या विरंगुळ्यासाठी, संताचे बोल तानदारीसाठी संगीत सुराने वरच्यावर भिरकवायचे, अंतःकरणाचा नि त्यांचा जणू काही संबंधच नाही. सहानुभूती, सहकार, सेवा ह्या भावनाच हद्दपार झालेल्या अशी सामाजिक, धार्मिक अवस्था झालेल्या समाजजीवनाला परिवर्तीत करण्याकरिता त्यांचा संसार त्याग होता. त्यांची स्वतःच्या उद्धारासाठी तळमळ नव्हती. समस्त सजीवांच्या आधिव्याधींची कोंडी त्यांना सोडवायची होती.
अज्ञातवास : गाडगे बाबांनी इ.स. १९०५ ते इ.स. १९१७ या काळात भ्रमंती करीत असताना समाजातील विविध प्रवृत्तींचे सूक्ष्म निरीक्षण केले. समाजातील वास्तविक भयावह चित्रण त्यांनी बघितले आणि अनुभवले देखील. याच काळात त्यांनी काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या षडरिपूंवर विजय मिळविला. कशाचीही भिती न बाळगता पाय नेतील तिकडे भ्रमंती करीत होते.
रात्र होईल तेथे एखाद्या झाडाखाली झोपावे. सूर्य उगवला की, काही गावामध्ये फिरायवे, एखाद्या गावात एखाद्या घरी भाकरी मागावी. मिळाल्यास खावी न मिळाल्यास आणखी काही तरी मागावे. लोकांनी रागवावे, शिव्या द्याव्या, मारायलाही उठावे, हुसकावून द्यावे. त्याचा गाडगे बाबांच्या शांत वृत्तीवर कोणताही परिणाम व्हायचा नाही. हाकलून दिले की पुढे जावे अशा तऱ्हेने गावामागे गाव धुंडाळीत भटकंती करीत होते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
लोकांच्या प्रश्नांना विचित्र उत्तरे देत. एकांतात एखाद्या झाडाखाली भजन करीत. याच काळात अंधश्रद्धाळू, अज्ञानी समाजाचे दर्शन त्यांना झाले. समाजाला सुधारावयाचे आहे तर आत्मा परमात्मा, अध्यात्म, ध्यान, चिंतन, मोक्ष, जीव, ब्रम्ह अशा तऱ्हेच्या अनाकलनीय बाबींच्या मागे न लागता समाजात राहून लोक प्रबोधन व सेवा करायला त्यांनी प्रारंभ केला. कोणी अडचणीत असल्यास स्वत: जाऊन त्याला मदत करायचे.
एखाद्याची बैलगाडी चिखलात रूतून पडलेली दिसली की गाडगे बाबा गाडी बाहेर काढण्याकरिता मदत करायचे. गाडीवाल्याने कोण, कुठचा, काय पाहिजे विचारले तर नुसते हसायचे. दोन हातांनी नमस्कार करायचे व आपल्या वाटेनेकाहीही न बोलता निघून जायचे. एखाद्या गावात जाऊन खराट्याने अंगण साफ करीत, एखाद्या ठिकाणी घाणेने घेरलेला सार्वजनिक विहिरीच्या भवतालची घाण साफ करायचे आणि गुराढोरांना विहिरीतले स्वच्छ पाणी काढून पाजून हेही जीव आहेत त्यांना घाणेरडे पाणी पाजू नका हा संदेश द्यायचे.
एखाद्या शेतात ज्वारीची कापणी चालू असली की, थकलेल्या एखाद्या मजूराजवळील विळा घेऊन कापणी करायचे, औत चालू असेल तर तास दोन तास औत चालवायचे. कोणी खायला दिल्यास लांब जाऊन एकांतात खायचे. त्यांच्या नि:स्वार्थ भावनेने चाललेल्या सेवेने त्यांच्याकडे लोक आकर्षित होऊ लागले. आता लोक त्यांना गाडगे बुवा, मडके बुवा, लोटके बुवा, चापरे बुवा, चिंधे बुवा इत्यादी नावाने ओळखत असत. त्यानंतर त्यांनी समाजातील इतर लोकांना सोबत घेऊन समाज प्रबोधन सुरू केले. या बरोबरच विविध संस्थांची स्थापनाही केली.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
ऋणमोचनमधील प्रारंभीचे कार्य : अमरावती जिल्ह्यातील ऋणमोचन या गावामध्ये पौष महिन्याच्या दर रविवारी यात्रा भरत असे. त्या निमित्ताने तेथे लोकांची गर्दी व्हायची. हे लोक नदीत स्नान करीत, पण त्याकरिता कसलीही सोय नव्हती. म्हणून गाडगे बाबांनी नदीच्या तीरावर पायऱ्या करायला प्रारंभ केला. त्यानंतर लोकांच्या सहकार्याने इ.स. १९०८ मध्ये नदीला कायमस्वरूपी घाट बांधले.
गोरक्षण शाळा : खुद गाडगे बाबांनी मामाच्या गावाला लहान होते तेव्हापासून शेती केली. त्यामुळे गाई, बैल आदींशी त्यांचा निकटचा संबंध होता. मानवाच्या अन्न निर्मितीसाठी बैलांकडून किती कष्ट करून घ्यावे लागतात हे बाबांना कोणाला विचारण्याची गरज नव्हती. त्यामुळे गाई, बैल इत्यादी प्राण्यांवर त्यांचे लहानपणापासूनच अत्यंत प्रेम होते.
अनेक लोक गाय, बैल म्हातारे झाले की त्यांना येईल त्या किंमतीत कसायाला विकत असत. म्हणून त्यांनी अनाथ जनावरांकरिता गोरक्षणाची स्थापना केली. याकरिता त्यांना मूर्तीजापूरचे नानासाहेब यांचे विशेष सहकार्य लाभले होते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
कीर्तन व स्वकृती लोकशिक्षणाचे माध्यम : भारतीय समाजावर धार्मिकतेचा मोठा पगडा आहे. त्यामुळे येथील लोकांना कथा, कीर्तन, भजन, भारूड आदी धर्मप्रचार करणाऱ्या साधनांचे आकर्षण आहे. त्याकरिता वेळातला वेळ काढून ते ऐकायला जातात. कथा कीर्तन ऐकणे म्हणजे ईश्वराची भक्तीच आहे. अशी लोकांची भाबडी भावनाआहे हे गाडगे बाबांनी लक्षात घेतले.
लोकांना अक्षरांचे ज्ञान नाही, त्यांचा भूतिज्ञानावर भर आहे. म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधण्याकरिता कीर्तन हे माध्यम उत्तम आहे हे बाबांनी जाणले होते. जरी गाडगे बाबांनी कीर्तनाला समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून स्वीकारले होते. तरी परंपरागत कीर्तन आणि गाडगे बाबांचे कीर्तन यामध्ये खूप फरक होता.
परंपरागत कीर्तनामध्ये स्थळ, काळ, वेळ, पूर्वरंग, उत्तररंग कीर्तनकर्त्याचा पोषाख आदी मर्यादा कीर्तनकर्त्याला सांभाळाव्या लागत. परंपरागत कीर्तनामध्ये. श्रोतेगण निष्क्रीयपणे ऐकत राहायचे परंतु गाडगे बाबा प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून श्रोत्यांशी संवाद साधत, त्यांना बोलते करायचे. परंपरागत कीर्तनात आध्यात्म, ईश्वर, आत्मा, परमात्मा, मोक्ष असे विषय असत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
तर गाडगे बाबांच्या कीर्तनात लौकीक जीवन आणि मानव हा विषय असायचा. परंपरागत कीर्तनात पेटी, तबला, झांज, टाळ, मृदंग, विणा इत्यादी वाद्ये असावी लागतात, तर गाडगे चीन बाबांच्या कीर्तनात दोन्ही हातांनी वाजविलेल्या टाळ्या पुरेशा असत. परंपरागत त्येक कीर्तन धार्मिक स्थळी किंवा देवळातच होत असे. गाडगे बाबांच्या कीर्तनाला जागेचे बंधन नसायचे.
त्यांचे कीर्तन उघड्या, स्वच्छ जागेवर होत असे. त्यांचा पेहरावही सामान्य माणसासारखा असायचा. गाडगे बाबा श्रोत्यांसोबत संवाद केलं साधून त्यांचे दोष दाखवून देत असत. गाडगे बाबांच्या प्रबोधनापासून प्रेरणा घेऊन अनेक कीर्तनकार तयार झाले होते. त्यामध्ये सर्वच जाती-जमातीतील स्त्री-पुरुष असत.
एखाद्या कीर्तनकाराला कीर्तनाला जा असा गाडगे बाबांनी हुकूम दिला तेव्हा एखाद्या नवीन कीर्तनकाराने कुठे जाऊ बाबा, असा प्रश्न विचारला की, बाबा म्हणायचे, *हवा तिथे हवेसारखा जा. पाय नेतील तिकडे जावे, हरिनामाचा गजर करावा, कीर्तन करावे आणि पुढे चालते व्हावे, सारा देश आपल्याला मोकळा आहे. ज्या ठिकाणी बाबांचे अनुयायी कीर्तनकार कीर्तन करीत तेथे शेवटच्या दिवशी बाद जात असत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
स्वतः कीर्तनाचे पटांगण झाडून साफ करीत. नंतर कीर्तन करीत गाडगे बाबांनी श्रोत्यांना आवाहन करताच हजारो रूपये, अन्न, धान्य गोळा व्हायचं परंतु ते सर्व गोरगरिबांकरिता खर्च करीत. त्यामधील एक दाम सुद्धा स्वत:साठी खर्चत नसत. गाडगे बाबा निरक्षर होते. त्यांना संत तुकारामांचे अभंग, संत कबीराधे दोहे व इतर साहित्य कसे मुखपाठ झाले असावे?
त्यांना नक्कीच देवी प्रसाद आहे अशी भ्रामक कल्पना लोकांची आहे. याविषयी गाडगे बाबा सांगतात, “माझ्या भटकंतीत मला एक परीट बुवा भेटला. नाव, गाव आता आठवत नाही. तो चांगला शिकला सवरलेला होता. मोठा कर्मकांडी, स्नान, जपतप, पोथी पुराणे वाचणे यांचे मोठे वेड. सारखा तो त्यातच गुरफटलेला असायचा. टिळे, माळ, भस्म, रूद्राक्ष अंगावर भरपूर. तुकोबारायांचे अभंग रोज तो वाचून समजावून सांगायचा.
‘समजले नाही अशा मुद्रेने मी मुकाट बसलो की तो अभंग पुन्हा पुन्हा जोराजोराने सुरावर वाचायचा. मला तोंडपाठ व्हायचा. लगेच त्या रात्रीच्या कीर्तनात मी तो सांगायचो.’ गाडगे बाबांनी कीर्तनाबरोबरच स्वकृतीलाही लोकशिक्षणाचे माध्यम बनविले. त्यांनी स्वच्छतेचा संदेश स्वतः हाती झाडू घेऊन गावागावातील घाण साफ करून दिला.
अंगमेहनत, श्रमनिष्ठा व स्वाभिमान हा संदेश देण्याकरिताकष्टाचे काम केल्याशिवाय कुणाच्याही घरी भाकरी खात नसत. पशु हत्या होऊ नये म्हणून पशु मारण्याकरिता खणलेल्या खड्डयात ते स्वतः जाऊन बसले पशु बळी देण्याऐवजी मला बळी द्या’ असे म्हणून मानवाचा आणि प्राण्यांचा जीव सारखाच आहे हे त्यांनी पटवून दिले.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
मृत्यूनंतर मद्य व मांस यांचे भोजन देण्याची प्रथा होती पण त्यांनी स्वतःची दोन मुले वारली तेव्हा ही प्रथा पाळली नाही. स्वतःच्या मुलामुलींची लग्ने साध्या पद्धतीने, जुन्या कपड्यावर कमी खर्चात व हुंडा न घेता केली. बांधकामावरील कामे, शेतीची कामे, यात्रेकरूंच्या सोयी करणे, निराधार रोग्यांची सेवा ही सर्वच कामे गाडगे बाबा स्वतः करायचे. त्यांनी शब्द आणि कृती यामध्ये अंतर ठेवले नाही. शब्दांबरोबर कृतीतून लोकप्रबोधनाचे कार्य केले.
शिक्षणविषयक विचार व कार्य : निरक्षरांना कसे लोक फसवितात, त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कसे त्यांना वेठीस धरतात हे महाराजांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहले होते. एकदा एका निरक्षर असलेल्या व्यक्तीचा मुलगा मुंबईला कामावर गेला होता. काही दिवसांनी त्याच्या मुलाचे पत्र आले. तो निरक्षर व्यक्ती पत्र घेऊन गावातील कुलकर्ण्याकडे गेला नि म्हणाला, “दादा पोराचे काल पत्र आलय ते जरा वाचूनशी दावा, पाया पडतो”, ते पत्र कुलकर्ण्याने घेतले.
ही माझी लाकडे दे फोडून आधी, मग दाखवतो वाचून. कुलकर्णी बोलला, “पण पोरगा खुशाल तर आहे ना दादा?” तास दीड तास खपून त्याने दीड-दोन गाडीभर लाकडे फोडून ढिगारा रचला “पोरगा खुशाल आहे ना, एवढ तरी सांगा दादा” अशासारख्य विनवण्या तो मधून मधून करीत होता पण प्रत्येक विणवणीला एक शिव हासडून ‘आधी लाकडे फोड गाढवा’ असा कुलकर्ण्याचा तडाखा चालू. पाण्याचा लोटा मागितला तरीही शिवी आणि “काम पुरे कर आधी शेवटी जीव कासावीस होऊन तो घामाघूम मटकन खाली बसला “दादा तुम्हाला वाचायचे नसेल त परत द्या, घेतो आणखी कुठून तरी वाचून.
पण या गाठी फोडण्याची ताकद नाही मला. गाठी फुटत नसतील तर पत्रही देत नाही परत जा चालता हो असे कुलकर्णी बोलला. कपाळावर हात मारून तो परत फिरणार तोच गाडगे बाबा तेथे आले. दुरून बराच वेळ त्यांनी कुलकर्ण्याच्या बेमाणुसकीचा तमाशा पाहिला होता. गाडगे बाबांनी कुऱ्हाड घेऊन ती लाकडे फोडली आणि कुलकर्ण्याला म्हटले, “काय दादाजी आता देता की नाही या महाराचे पत्र त्याचे त्याला कुलकर्ण्याने पत्र न वाचताच परत दिले.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
गाडगे बाबा म्हणाले “तू नि मी दोघेही गाढव आहोत. चार अक्षर शिकलो असतो तर तुझी अवस्था ही अशी कशाला असती आणि माझीही अशी का असती? शिक्षणाशिवाय माणूस घोडा. घटनेपासून गाडगे बाबांनी कीर्तनातून शिक्षणाचे महत्त्व जनमानसात रुजविले त्यांनी साक्षर व निरक्षर यातील फरक ओळखून दारिद्रयाच्या अज्ञानाच्या मुळाशी निरक्षरता हेच कारण आहे. खेड्यात सावकार व अन्य सरंजामशाही अज्ञानी लोकांचा कर्ज देताना गैरफायदा घेत असत.
जास्त रकमेवर अंगठा घेऊन जमिनी व मालमत्ता हडप करीत. त्यामुळे वर्षानुवर्ष शेतकरी कर्जाच्या बोज्यातून बाहेर पडत नव्हता. म्हणून गाडगे बाबा लोकांना सांगत, मुलांना शिक्षण देण्यासाठी पैसा नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाच घ्या, इवायाचे पाहुणचार करू नका, पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका.” “ज्याले विद्या नसेल, त्याले खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल.
गाडगे बाबा शिक्षणाचे महत्त्व सांगताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देत. आंबेडकरांसारखे शिका, मोठे व्हा, असे आवाहन करीत. गाडगे बाबांनी केवळ शिक्षणाचा प्रचारच केला नाही तर गरीब, अनाथ विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृहे व शाळा काढण्यास लोकांना प्रेरणा दिली. प्रवृत्त केले. एवढेच नव्हे तर त्यासाठी लागणारा निधी यथाशक्ती गोळा करून दिला.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव देशमुख यांची शैक्षणिक कार्याबाबत ते नेहमी भेट घेत असत. इ.स. १९३९ मध्ये सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या शाळेच्या कोनशिला समारंभाच्या वेळी गाडगे बाबांनी कीर्तनात सांगितले, “मुलांना निरक्षर ठेवणे पाप आहे.
त्यांना शिकवा म्हणजे कळेल की कर्ज काढून सण साजरा करू नये. दुसरे पाप नशा करणे. भाऊराव लोकांचे भले करावयास निघाले. त्यांना मदत करा. शैक्षणिक कार्याला मदत करणे हीच देवाची भक्ती आहे. हीच देवाची महापूजा होय. या परस दुसरे पुण्य नाही.” पंढरपूर येथील संत चोखामेळा धर्मशाळेमध्ये गाडगे बाबांनी दलित विद्यार्थ्यासाठी राहण्याची व्यवस्था केली होती. इ.स. १९४५ मध्ये ही धर्मशाळात्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे सोपविली.
यावेळी स्वतः गाडगे महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील उपस्थित होते. याप्रसंगी गाडगे बाबा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले होते, “धर्मशाळेत मुलांचे वसतीगृह चालवत जा, मुलांना शिकवा, मोठे होऊ द्या.” राहूरी येथे गाडगे बाबांनी आदिवासी भिल्ल लोकांना माणसात आणून त्यांचे जीवन सुखी करण्याकरिता त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची फुकट सोय व्हावी म्हणून इ.स. १९५४ ला आश्रमशाळा काढली. याच वर्षी मूर्तीजापूर येथेही विद्यालय सुरू केले होते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
जातीयता व अस्पृश्यता निवारण : गाडगे बाबा भटकंती करीत असताना समाजातील जातीयता व अस्पृश्यतेचे चटके आपल्याच बांधवांना कसे सहन करावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला होता. यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगांव येथे त्यांच्या सोबत घडलेली घटना – गाडगे बाबा गावाच्या विहिरीवर हातपाय सोडून बसायचे.`
मालक दिसला की त्याला विचारायचे “काय हो महाराची विहीर कोणती?” गाडगे बाबांना तो महार समजून आईमाईवरून शिव्या द्यायचा. गाडगे बाबा त्यावर म्हणायचे, “पण मालक मी नुसतो बसलो आहे पाणी नाही प्यालो अजून, आता पितो” मालक दगड धोंडे मारून त्यांना हुसकावून द्यायचे असा अमानवीय अनुभव गाडगे बाबांनी प्रत्यक्ष घेतला.
ही जातीयतेची व अस्पृश्यतेची बंधने तोडून समाजाला मानवता हा खरा धर्म आहे ही शिकवण दिली. १९ जुलै १९५४ च्या नाशिक येथील भाषणामध्ये गाडगे बाबा म्हणतात, अस्पृश्यता हा कलंक आहे, माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणांपासून महारांपर्यंत सगळी माणसे एकाच होळीतील प्रवासी आहेत. कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही” गाडगे बाबांनी आपल्या संस्थांमधून अस्पृश्यता हा शब्द काढला होता.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
शिवाशिव हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे असे ते म्हणत. कीर्तनानंतर दुसऱ्या दिवशी जो भंडारा होई त्यामध्ये जातीवाद, अस्पृश्यता मुळीच पाळल्या जात नसे. त्यांच्या अनुयायांमध्ये ब्राम्हण होते तसेच अस्पृश्य देखील होते. त्यामध्ये अभिमान बुवा, चोखामेळा, शिवलींग बुवा हे पट्टीचे कीर्तनकार होते. इ.स. १९१७ साली गाडगे बाबांनी अस्पृश्य लोकांची सोय व्हावी याकरिता पंढरपूर येथे “संत चोखामेळा” धर्मशाळा बांधली होती.
स्वच्छता : स्वच्छता आरोग्यदायी जीवनाचा पाया आहे म्हणून गाडगे बाबांनी संपूर्ण जीवनात स्वच्छतेच्या बाबतीत स्वतः कृती करून जनमाणसात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. यामुळेच “डॉ. पंजाबराव देशमुख यांचा खडू व गाडगे बाबांचा झाडू” ही म्हण सर्वांना परिचित आहे. बहुसंख्य जनता खेड्यात राहत असल्यामुळे गाडगे बाबा गावागावांमध्ये जाऊन संपूर्ण गाव स्वच्छ करीत असत तसेच ऋणमोचन काय किंवा पंढरपूर काय अशा यात्रांच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य, दुर्गंधी, डास, ढेकूण यांचा उपद्रव असे.
गोरगरिबांचे तर खूपच हाल होत. परिणामी साथीच्या रोगांचा प्रसार होत असे. अशा यात्रांच्या ठिकाणी जनता जनार्दनाची निःस्वार्थपणे सेवा करण्यासाठी गाडगे बाबा पंधरा-पंधरा दिवस आधी जात. आपल्या खराट्याने यात्रेचे ठिकाण स्वच्छ करून गोरगरीबांच्या अरोग्याची काळजी घेत परंतु यात्रा संपल्यानंतर पुन्हा घाण जशीच्या तशीच व्हायची. तेव्हा गाडगे बाबा ती स्वच्छ केल्याशिवाय परत येत नव्हते. आपल्या कीर्तनाचे पटांगण गाडगे बाबा स्वतः स्वच्छ करायचे व संध्याकाळी कीर्तनाद्वारे बुद्धीवर साचलेली अंधश्रध्देची, जातीवादाची धुळ स्वच्छ करीत असत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
बळी प्रथेला विरोध : महाराष्ट्रात महादेव, खंडोबा, वेताळ, मरी आई, मातामाय, मानाई, बहीरमबुवा वगैरे देवतांच्या पुढे नवस फेडण्यासाठी बकरी, रेडे, कोंबडी, डुकरे यांचा बळी देण्याची दुष्ट प्रथा होती. अनेक वेळा माणसांचा सुद्धा बळी दिल्या जायचा. गाडगे बाबांनी आपल्या कीर्तनातून या कुप्रथेविरूद्ध समाजामध्ये प्रबोधन करून ती बंद कण्याकरिता प्रयत्न केले.
ते लोकांना कीर्तनातून सांगायचे मुक्या प्राण्यांवर दया करा. देवाच्या नावावर त्यांचे बळी देऊ नका. देवाला पशु पक्षाचे बळी लागतात हे पोटभरू लोकांनी केलेले नाटक आहे. पशु-पक्षांनाही आपल्याप्रमाणे जीव आहे, म्हणून त्यांच्यावर प्रेम करा. त्यांची आजारपणात काळजी घ्या.
‘मांस मांस सब एकही है। मुरगा बकरा, गाय । ऐसा मानव चुतिया बड़ा प्रेम से खाय ।।
अपने बेटे का शिर मंडावे देख सुरा लंग जाय।’दुसरे की तो गर्दन काटे जरा शरम नही आय।’
अशा तऱ्हेच्या संतवचनांचा आधार घेऊन गाडगे बाबा कीर्तनात पशुहत्या बंदीचा र करीत आणि दगडालाही पाझर फुटेल अशा युक्तीवादाने लोकांची मने प्रसार जिंकून त्यांना या हिंसक कृत्यापासून परावृत्त करीत.
भूतदया : गाडगे बाबांना आपल्या भ्रमंतीमुळे समाजात असलेले असीम दारिद्र्य दिसले. यात्रेच्या ठिकाणी दुतर्फा बसलेल्या महारोग्यांच्या, अंध-पंगू, दीन दुबळ्यांच्या रांगा पाहिल्या. अन्न पाण्यावाचून मरणासन्न झालेली जनता त्यांना दिसली. मुक्या प्राण्यांवर होणारा अत्याचार त्यांनी पाहिला. प्राणीमात्रावर दया करणे हाच खरा धर्म आहे आणि हिच खरी ईश्वर सेवा आहे हे सत्य त्यांनी जाणले.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
‘जे जे भेटे भूतं । ते ते मानिजे भगवंत ।
हा भक्तियोग निश्चित । जाण माझा ।।
‘तीरथ जाव काशी जाव, चाहे जाव गया।
कबीर कहे कमाल कू, सबसे बडी दया ।।’
संताची ही वचने देत गाडगे बाबांनी प्राणीमात्रांची सेवा करून प्राणीमात्रांवर प्रेम करावे हा संदेश आपल्या कीर्तनातून दिला. अमरावती येथील डॉ. शिवाजीराव पटवर्धनांच्या श्री जगदंबा कुष्ठ या निवास, अहमदनगर येथील मेहेरबाबांचा आश्रम इत्यादी ठिकाणी जाऊन गाडगे बाबा कुष्ठरोग्यांची सेवा करीत, त्यांच्या समोर कीर्तन करीत. मुंबई-नागपूरसारख्या चे शहरातील दवाखान्यामध्ये रोग्यांना उपचारासाठी जावे लागत असे.
त्यांना सोबतही आवश्यक असे. त्यांची गैरसोय पाहून तेथे गाडगे बाबांनी धर्मशाळा उभारल्या, पाणपोईलाही त्यांनी विशेष महत्त्व दिले होते. वाटसरूंची तसेच गरिबांची पाण्याची सोय व्हावी याकरिता ठिकठिकाणी पाणपोई सुरू केल्या. पंगू लुळे-पांगळे, दीन-दुबळे यांच्याकरिता त्यांनी अन्नछत्रे सुरू केलेत. अनेक लोकांना अंग झाकायला सुद्धा कपडे मिळत नसत अशा लोकांना कपडे दिलेत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
मनुष्य प्राण्याप्रमाणे गाडगे बाबांनी मुक्या प्राण्यांचीही सेवा केली.बैलांना ते जगातले खरे संत म्हणून पूज्य मानत असत. कारण त्यांच्या मते रात्रंदिवस कष्ट करून जो जगाला अन्न देतो, सुख देतो तोच खरा संत. जे. शेतकरी बैल किंवा गाय निरूपयोगी झाल्यावर कसायाला विकायचे त्यांच्यावर त्यांनी तीव्र टीका केली.
म्हाताऱ्या आईबापांचा आपण जसा सांभाळ करतो तसा त्यांचाही गोरक्षणे उघडून सांभाळ करावयास ते सांगायचे. गाडगे बाबांनी स्वतः गोरक्षण शाळा उघडल्या होत्या. नवसापोटी ग्रामदेवतेसमोर निरपराध पशूंची सर्रास होणारी पशुहत्या थांबविण्याकरिता त्यांनी सतत प्रयत्न केले.
साधे काटकसरी व स्वावलंबी जीवन जगण्याचा उपदेश : गाडगे बाबा स्वत: स्वावलंबी होते. ते संसारामध्ये असतानाही त्यांनी जे काही मिळविले ते कष्टाने मिळविले. कधी कोणासमोर लाचारी पत्करली नाही. संसाराबाहेर पडल्यानंतर कधी स्वतःकरिता त्यांनी कुणालाही काही मागितले नाही. त्यांनी जनतेलाही साधे काटकसरी व स्वावलंबी जीवन जगण्याचा उपदेश दिला. स्वतःचा निर्वाह स्वतः करावा, मिळेल ते काम करावे, खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नये, असे ते सांगत असत.
डॉ. सहस्त्रबुध्दे यांनी गाडगे बाबांच्या पत्नीला त्यांच्या घरी राहू दिले हे कळल्यावर गाडगे बाबांनी त्यांना पत्र लिहून आपल्या पत्नीला फुकट खाऊ घालू नका, असे डॉ. सहस्त्रबुध्देना स्पष्ट बजावले व लिहिले की माणूस कामाशिवाय खाऊ लागला की कामाची प्रतिष्ठा कमी होते. गाडगे बाबांनी जीवनात काटकसर करण्याचा परामर्श दिला. ते म्हणायचे, “कोणत्याही मोठ्या कामाचा प्रारंभ आपण केलेल्या काटकसरीतून होतो. यासाठी माणसाने संयमाने व सामंजस्याने काम करावे.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
संसारात काटकसर करावी, जमाखर्च ठेवावा, आपल्या ठेवी पाहून खर्च करावा.” “उधारी ठेवू नका, कर्ज काढू नका कारण हे दोन्ही माणसाचे शत्रू आहेत. दिवाळीच्या दिवशी बेसन, भाकरी खा पण कर्ज काढून करंज्या, लाडू करू नका. बायांनो दिवाळीच्या दिवशी फाटके लुगडे नेसा, पण उधार लुगडे आणून भडक दिवाळी साजरी करू नका. घरचा म्हातारा मेला तर त्याला फाटक्या कपड्यात गुंडाळून न्या पण उधार कपडे आणून मढे साजरे करू नका.
मेल्या माणसाची हाडे गंगेत टाकली तरी पुण्य नाही व गटारात टाकली तरी पाप नाही. मेल्या माणसाचा दशक्रियेचा दिवस साध्या वरण भाकरीने साजरा करा, पण कर्ज काढून मिष्टान्न | भोजनाच्या पंगती उठवू नका. कर्ज काढून लग्न करू नका, कर्ज काढून घर बांधू नका, कर्ज काढून सग्याला देऊ नका, कर्ज काढून धर्म करू नका, कर्ज काढून तीर्थाल कधीही जाऊ नका”, असा संदेश लोकांना सतत कीर्तनातून ते देत व जनतेच्या दारिद्र्याला जी कारणे जबाबदार आहेत ती अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांच्यासमोर मांडत असत.
वाईट व्यसनमुक्त जीवनाचा संदेश : समाज अनेक वाईट व्यसनांच्या आहारी गेला होता. दारू, जुगार, वरली-मटका, गांजा, तंबाखू, बिडी, सिगारेट, अफु, चरस, भांग या व अशा प्रकारच्या मादक पदार्थाच्या सेवनाने अनेक सुखवस्तू घराणे धुळीस मिळालेली होती व गरीब अधिक दारिद्र्याच्या खाईत लोटल्या जात होते. दारूच्या व्यसनाने तर कहरच केला होता. वडिलांना लागलेल्या दारूच्या व्यसनामुळे झालेले दुष्परिणाम गाडगे बाबांनी स्वतः भोगले होते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
समाजामध्ये गरीब असो की श्रीमंत त्यांना जन्म, लग्न, बारसे, तेरवी इत्यादी धार्मिक कार्याच्या निमित्ताने बकऱ्याची कंदूरी आणि मनसोक्त दारूही सोयरे-धायरे आणि जात बांधवांना द्यावी लागे. कर्ज काढून किंवा भीक मागून सुद्धा हे प्रसंग साजरे करावे लागत. जो हा जात धर्म पाळणार नाही, त्याला जातीबाहेर टाकण्याची प्रथा रूढ होती. परंतु गाडगे बाबांनी ही प्रथा पाळली नाही.
त्यांना मुलगी झाली तेव्हा आईचे वडील हंबीररराव आजोबांनी समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे बोकुडाची कंदूरी आणि दारूचा बेत निश्चित केला. हे कळताच दारूच्या दुष्परिणामांची मालीका बाबांच्या डोळ्यासमोर तरळू लागली. देवकार्यात मांसाहाराची मेजवानी दिली पाहिजे असे कोणत्याच धर्मात सांगितले नाही, असे सांगून गाडगे बाबांनी या मेजवानीला विरोध केला.
आपल्या घरात मांस-दारू कायमची बंद झाली. हा निर्णय बाबांनी आजोबांना कळविला. मिष्टान्न भोजन देऊ असे ठरविले. सोयरे जातबांधव निराश झाले. गाडगे बाबांनी त्यांची पर्वा केली नाही. दारूच्या नशेत बरेच महाभाग रस्त्याच्या कडेला घाणेरड्या मोरीत, गटारात लोळतात, निपचीत पडलेले आढळतात. सर्व कमाई दारूत खर्च करतात. घरातले भांडे, अन्नधान्यही विकून टाकतात. घरी भूक-भूक म्हणून अन्नासाठी रडणाऱ्या लहान-लहान लेकरांना आई मारझोड करून गप्प बसविते आणि तशीच त्यांना झोपविते.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
नवरा दारू पिऊन घरी आल्यानंतर कोणतेही निमित्त करून लहान लेकरांसह पत्नीची हत्या करणारेही काही महाभागसमाजात आहेत. हेही गाडगे बाबांच्या सूक्ष्म निरीक्षणतून सुटले नाही. स्त्रियांन अशा छळातून मुक्त करण्यासाठी त्यांना संरक्षणाची नितांत गरज आहे म्हणून त्यांनी पोटतिडकिने आपल्या कीर्तनातून व्यसनमुक्तीचा प्रचार केला.
ते आपल्या कीर्तनातून स्त्रियांना सांगत, “बायांनो! हा नवरा तिर्थाला जाईल जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात पण तुमचा देव घरात आहे. आपआपल्या नवऱ्याची संव करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा.” ‘ऐसा पतिव्रत भाव । तिचा नवरा तिला देव।’ हे ऐकून पुरुष मंडळी आनंदाने डोलत असे.
पण बाबा म्हणत, “नवऱ्याच अंगात देवाचे गुण पाहिजेत की नाही? नाही तर नवरा साला दारू पिऊन आल अन् घरात वोकला असा नवरा असेल तर बायकोनं गरम चुलीतील राख टोपल्यात भरावं अन् त्याच्या तोंडात टाकून द्यावं अन् म्हणावं हे घे तुयी महापूजा ”
हुंडा प्रथेला विरोध, आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार : गाडगे बाबांनी लग्नकार्यात दिल्या जाणाऱ्या हुंड्याचा निषेध केला. ते सांगायचे, “जो हुंडा घेण्याचे पाप करील त्याच्या लग्नात कोणी जाऊ नये. हुंड्याच्या कुप्रथेमुळे दोन्हीही कुटुंबे कर्जबाजारी होतात. सावकाराचे दास बनतात. श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा झुणका भाकरीने लग्न प्रसंग साजरा करावा. एका लग्न प्रसंगामध्ये नवरा नवरीला हळद लागल्यानंतर वर पित्याने हुंड्याची मागणी केली.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
वधुपिता घाबरला. वरपिता आपला हट्ट सोडीन, हे लग्न मोडले असा पुकारा करून गाडगे बाबांनी दुसरा तरूण लग्नासाठी उभा केला. त्यांचे लग्न लावून दिले. त्या हुंडेबाज तरूणाला कोणीही मुलगी दिली नाही. या अनिष्ट प्रथेमुळे मुलींच्या वडिलांना तिचे लग्न जुळवितान अतिशय त्रास होतो.
काही मुलींचे लग्न होत नाही. मग आपण मुलीचे लग्न करून देण्यास असमर्थ ठरतो ही भावना वडिलांना आयुष्यभर बोचत राहते त अनेक मुली आत्महत्या करतात. काही मुलींचा लग्नानंतर हुंड्याकरिता छ होतो. अशी ही समाजात रूढ झालेली कुप्रथा बंद करण्याचा गाडगे बाबांनी सतत प्रयत्न केला. गाडगे बाबांनी जगात दोन जाती अस्तित्वात आहे त्या म्हणजे एक पुरुष व दुसरी स्त्री असे मानले होते. तथापि लोक व्यवहारानुसार समाजान अनेक जाती-परजाती लोकांनी निर्माण केल्या.
जाती-जातींमध्ये रोटी व्यवहार काही प्रमाणात लोकांना मान्य होता. पण बेटी व्यवहार मान्य नव्हता. गाडगे बाबांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. दोन भिन्न जातीतील स्थळे परस्पर पुरक व योग्य असतील ते सुचवित. दोन्ही बाजुच्या लोकांना समजावून सांगत असत. ज्यांना पटायचे ते सहमत होत. असे अनेक आंतरजातीय विवाह त्यांनी आपल्या धर्मशाळेत साजरे केलेत.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
अन्नदान : गाडगे बाबा म्हणायचे “मी सांगतो अन्नदानासारखा जगात दुसरा धर्म नाही. तुम्ही भाग्यवंत लोक नेहमी आणि सणासुदीला गोडधोड करून खाता. बाबांनो जरा सभोवताल नजर टाका. शेकडो हजारो लाखो आंधळे-पांगळे, लुळे-लंगडे, कुष्ठरोगी, गरीब मुंग्यांच्या वारूळासारखे वळवळताहेत. उष्ट्यामाष्ट्या अन्नावर कशीतरी पोटाची खाच भरताहेत.
तुमच्या कमाईत नाही काहो त्यांचा काही हक्क. त्या आपल्या अभागी भावाबहिणींना सन्मानाने बोलावून वर्षातून एकदा तरी, एखाद्या यात्रेजत्रेच्या प्रसंगी गोडधोडाचे जेवण घालण्याची वहिवाट ठेवाल तर देवाला तोच खरा नैवेद्य, तीच त्याची खरी भक्ती नि तिच खरी त्याची महापूजा.” गाडगे बाबांच्या कीर्तनाला बाहेरगावचे अनेक लोक यायचे.
काही लोक स्वत:च्या जेवणाची व्यवस्था स्वतः करायचे, परंतु ज्यांची जेवणाची सोय नसायची असे कितीतरी लोक कीर्तनात असायचे. या गोरगरीब लोकांना अन्न मिळावे याकरिता ‘थोडे तरी फार, तुका म्हणे परोपकार’ या तुकोक्तीच्या संदर्भात बाबांनी लोकमताचा कल भंडाऱ्याकडे मोठ्या कुशलतेने वळवून घेतला.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
सप्ताहाच्या दिवशी भंडाऱ्याचा महाप्रसाद करविण्याचा प्रघात सर्वत्र रूढ केला. या ठिकाणी अतिशय शिस्त असायची, स्पृश्य-अस्पृश्यता, श्रेष्ठ-कनिष्ठ, धर्म, कुळ, जात असा कसलाही भेद नसायचा. सर्व लोक एकाच पंक्तीमध्ये भोजन करायचे. श्रध्देच्या नाजूक भावनांचा गैरफायदा घेऊन हजारो परान्नपुष्ट बैरागी नि फकीर जगत आले. तेव्हा देशासमोर अन्न टंचाईचा घोर संकटाचा प्रश्न आ वासून उभा असतानाही लोक निरूद्योगी चंगी-भंगी बुवा फकीरांना अन्न धान्य दान करीत.
अंधश्रध्देने होणाऱ्या या प्रचंड अन्नदानाचा ओढा गाडगे बाबांनी अत्यंत निराश्रीत आणि हतबल अशा हजारो अंध, पंगु, कुष्ठरोगी यांच्या जीवनधारणेकडे वळविण्यात दाखविलेली कुशलता आणि लोकमताला दिलेलीकलाटणी वाखाणण्याजोगी आहे. गाडगे बाबांनी अनेक मिष्ठान्नाच्या पंगती उठविल्यात, पण स्वत: कधी चुकूनही त्यातला एक घास तोंडात घातला नाही. ते कोठेतरी एखाद्या झोपडी समोर हरळी देऊन मिळेल ती भाकर, कांदा, चटणी मडक्यात खाऊन वेळेवर कीर्तनासाठी हजर व्हायचे.
गाडगे बाबांची निर्मोही वृत्ती : गाडगे बाबांनी संसाराचा त्याग केल्यानंतर त्याविषयी कोणताही मोह बाळगला नाही. ‘हे विश्वची माझे घर’ या भावनेने जनसेवा केली. त्यांनी मोहाला कसे जिंकले होते हे त्यांच्या जीवनातील काही प्रसंगावरून स्पष्ट होते. गाडगे बाबांचा मुलगा नऊ-दहा वर्षाचा झाला तेव्हां गाडगे बाबांच्या हितचिंतकांनी शिक्षणासाठी त्याला मुंबई, पुणे किंवा पंढरपूर येथे ठेवण्याची योजना केली.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
जेवणा राहण्याची उत्तम सोय करणारेही पुढे आले. पण त्याने कुठेही राहायचे असेल तर माधुकरी मागून विद्या शिकावी हा गाडगे बाबांचा आग्रह होता. गाडगे बाबांची आई सखूबाईने आपल्या नातवाचे (गोविंद) लग्न आपल्या डोळ्यासमोर व्हावे असे ठरवून मुंबई, वरळी येथे लग्नाचा बेत केला. अनेकांनी हवे ते सहकार्य करण्याची तयारी दाखविली. लग्नाची जय्यत तयारी सुरू झाली. गाडगे बाबांनी तेथे येताच सगळे श्रीमंती बाराबेत रद्द ठरविले व अतिशय साच्या पद्धतीने विवाह लावला.
गाडगे बाबांच्या आई सखूबाई एका खेड्यात आजारी पडल्या होत्या. ही बातमी बाबांना दिली आणि आईने भेटीचा घोसरा घेतला आहे, असे कळविले. ‘आई आजारी, तर एखाद्या चांगल्या डॉक्टराला बोलवा. मी येऊन मला कायत्यात समजणार?” असे उत्तर देऊन ते पुन्हा कीर्तनाला लागले. नंतर आईच्या मृत्यूची बातमी सहा महिन्यांनी त्यांना कळली. कलावती मुलगी लग्नानंतर पाच सहा वर्षांनी मृत्यू पावली.
ती हकीकत त्यांना दोन वर्षांनी समजली. श्री शिवाजी मराठा फ्री बोर्डींगात पुण्याला मराठी चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत असताना गोविंदाला कुत्रा चावला. वेळेवर औषध-पाणी न मिळाल्याने ५ मे १९२३ ला त्याचा मृत्यू झाला. त्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खरेपाटणा गावी बाबांचे कीर्तन होते. तेथे तार पाठविला. बाबा कीर्तनासाठी येऊन दाखल झाले.
तार हातात घेऊन एक गृहस्थ जवळ आले. तोच गाडगे बाबा त्यांना म्हणाले, “बाप्पा फार भूक लागली आहे. भाकर-विकर आणली का नाही?” पण त्याच्या तोंडून शब्दच निघेना. तो ढसाढसा रडायला लागला. झाले तरी काय? सांग बाप्पा, सांग असे गाडगे बाबांनी विचारताच त्याने गोविंदाच्या मृत्यूची बातमी सांगितली. निर्विकार मुद्रेने गाडगे बाबा उद्गारले मेले ऐसे कोट्यानुकोटी, काय रडू एकासाठी?पुन्हा कीर्तनाला सुरुवात केली.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
मृत्यू : संत गाडगे बाबांनी शेतकरी, कामकरी, अंधश्रद्धा, हुंडाबंदी, दारूबंदी सावकारी, जनावरांची हत्या, शिक्षण, व्यसनांचा दुष्टपणा, स्वच्छतेची जरूरी, अस्पृश्यता निवारण, स्त्री-पुरुष समानता इत्यादी विषयांवर चित्तवेधक कीर्तन, केले. सामान्य माणसांच्या मनातील अंधश्रद्धा व देव-देवस्थाने, देवारे माजविणाऱ्याभोंदुपणाला सुरूंग लावला व जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे हे तत्व स्वकृतीतून जनमनावर बिंबविले.
ते कीर्तनातून नेहमी सांगायचे की, “जन्मलेला माणूस भरतोच. मलाही आज ना उद्या मरण येणार. मला मरण कोणाच्या घरात, कोणाच्या दारात, संस्थेत यावयाला नको तर ते एखाद्या बेवारशी माणसांसारखे रस्त्यावर आले पाहिजे.” गाडगे बाबांना न्युमोनिया डायबेटीककॉमा हा रोग जडला होता. अमरावती जिल्ह्यातील नागरवाडी ता. चांदूर बाजार या गावावरून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना अमरावतीला घेऊन येत असताना वलगांव येथील पेढी नदीजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी रात्री १२.२० मिनटांनी त्यांचा मृत्यू झाला.
गाडगे बाबांच्या कार्याचा गौरव करताना आचार्य अत्रे म्हणाले होते, “गाडगे बाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते.” प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, या भूतलावर माणसाचा समाज नांदतो आहे. अनादी काळापासून आजवर माणसाच्या जातीने अनेक विक्रम केले. पराक्रम केले. चंद्रलोक उड्डाण केले. मंगळाला प्रदक्षिणा घातल्या. दुष्काळ दूर केले. कृत्रिम पाऊस पाडला, पण एक गोष्ट राहून गेली.
Sant Gadge Baba Information in Marathi – संत गाडगे बाबा
परस्पराशी वागावे कसे याचा माणसाला विसर पडला. माणूस माणसाला विसरला. माणुसकीला पारखा झाला. हे दृश्य पाहून बाबा गहिवरले. माणसातला माणूस जागा करणे हा त्यांनी आपला जन्माचा उद्योग केला. बाबांची रीत वेगळी, भाषा वेगळी, लिपी वेगळी. पृथ्वी हीच त्यांची पाटी, धरती हाच त्यांचा कागद, खराटा हीच त्यांची लेखणी, स्वच्छता हाच त्यांचा धर्म, जीवन हाच त्यांचा ग्रंथ, चिंध्या हेच त्यांचे महावस्त्र, लोटके हेच त्यांचे सोयरे, जग हाच त्यांचा जगदीश आणि जन हाच त्यांचा जनार्दन”