शिवरायांचे शिक्षण
शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. तेथे वयाला सात वर्षे झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले.
रामायण, महाभारत, भागवत यांतील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला.
लवकरच आदिलशाहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्ये जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुणे जहागिरीकडे रवानगी केली. त्या वेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज, तसेच विश्वासू प्रधान, शूर सेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले.
पुण्याचा कायापालट
जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंचउंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना खूपखूप आनंद झाला. त्या वेळचे पुणे आजच्याइतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती.
घरे मोडली होती, देवळे पडली होती. शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेते ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजले होते. अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या, हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले, तेव्हा लोकांना मोठा धीर आला.
जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. ल जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळांत सकाळ-संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले.
दादाजी कोंडदेवांची कामगिरी
जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते, तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतांत लागवड करावी, म्हणून दादाजींनी त्यांना
काही वर्षे शेतसाऱ्याची सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत, म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला.
शिवरायांचे शिक्षण शिवराय
पुणे जहागिरीत आले, तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या.
उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला.
वीरमाता जिजाबाईंची शिवरायांस शिकवण
जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्यांची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती.
जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला, तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशाहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता, की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील. या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या.
मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई. तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी-कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे, असे शिवरायांना वाटे.
घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. जिजाबाई म्हणत, “शिवबा, भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण. त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तूसुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तूसुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील.’
आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत. हे वीरपुरुष शिवरायांना सतत ध्यानी, मनी, स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले, तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला, तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले, तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे, असे शिवरायांना सतत वाटू लागले.
शिवरायांचा नवा अंमल
पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज नीळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच.
शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा, म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदु:खाच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता !
शिवरायांचा विवाह
त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती, तेव्हा जिजामाता म्हणाल्या, “आता शिवबाचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत.” मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला.
MPSC Online