चंद्राच्या गती
पृथ्वीप्रमाणेच चंद्रालादेखील अक्षीय व कक्षीय गती आहेत. चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते; त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला, तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो. चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते.
भौगोलिक स्पष्टीकर
पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण पृथ्वीप्रमाणे चंद्राची कक्षाही लंबवर्तळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते. जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो, त्या स्थितीस चंद्राची उपभू स्थिती म्हणतात. याउलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो, तेव्हा ती चंद्राची अपभू स्थिती असते. (आकृती २.१)
आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्या चंद्रबिंबाचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो, तर अमावास्येस तो पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो.
शुद्ध व वदय अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांमध्ये ९०° चा कोन होतो, त्या वेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो, म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो. (आकृती २.३ पहा.)
ग्रहणे
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५० चा कोन करते. परिणामी, चंद्र प्रत्येक परिभ्रमणादरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो. प्रत्येक अमावास्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत शून्य अंशाचा कोन असतो, तर पौर्णिमेला तो १८०° असतो.
असे असले तरीही प्रत्येक अमावास्या किंवा पौर्णिमेला सूर्य, चंद्र, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत, म्हणूनच प्रत्येक अमावास्या व पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. (आकृती २.४ पहा) काही पौर्णिमा व अमावास्यांना सूर्य, पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात.
सूर्यग्रहण
सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत व एका सरळ रेषेत असतात, त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते, तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली दोन प्रकारे पडते. मध्यभागात ती दाट असते व कडेच्या भागात ती विरळ बनते.
पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते, तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण होय. त्याच वेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते, ती स्थिती खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. (आकृती २.५ पहा) खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते.
काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखादया वर्तुळाप्रमाणे दिसते. हे ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ होय. (आकृती २.६ पहा) कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते.
चंद्रग्रहण
चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो, तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते.
पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते, तर काही वेळा चंद्र काहीसा झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. (आकृती २.८ पहा.)
|
सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये : * सूर्यग्रहण अमावास्येला होते, पण प्रत्येक अमावास्येला होत नाही. * सूर्य, चंद्र व पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. * खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी ७ मिनिटे २० सेकंद (४४० सेकंद) असतो. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये : * चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. * सूर्य, पृथ्वी व चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते. * खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी १०७ मिनिटे इतका असतो. |
ग्रहण- एक खगोलीय घटना
सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. यात शुभ-अशुभ असे काहीही नसते. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असते. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणीच असते.
ज्या भागात ग्रहण दिसणार असेल, तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्याने त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसादही वेगळा असतो.
हे नेहमी लक्षात ठेवा.
सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक असते, कारण सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. |
माहीत आहे का तुम्हांला ?
पिधान व अधिक्रमण
ग्रहणाप्रमाणेच चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात, त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते, तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होते.
पिधान (Occultation)
ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखादया ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. या वेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते.
अधिक्रमण ( Transit )
पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यांपैकी एखादा अंतर्ग्रह आला, तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्य बिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यांत फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच असते.